Aamir Khan Gauri Spratt marriage
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नानंतर निर्माण झालेल्या वादावर आता स्वतः आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. विविध हिंदू संघटनांकडून 'लव्ह जिहाद'चे आरोप आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर आमिरने आपल्या कुटुंबातील आंतरधर्मीय विवाहांची उदाहरणे देत भूमिका स्पष्ट केली. 'गौरी स्प्रॅटने लग्नानंतर धर्मांतर केलेले नाही; ती हिंदू नाही तर ख्रिश्चन आहे,' असे त्याने स्पष्ट केले.
एका मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, "आमचे कुटुंब नेहमीच सर्व धर्मांचा आदर करणारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने हिंदू कुटुंबात झाली आहेत. माझी मुलगी आयरा हिचाही विवाह हिंदू तरुणाशी झाला आहे. माझा चुलत भाऊ मन्सूर याने एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केले आहे."
आमिर पुढे म्हणाला की, "गौरी, रीना आणि किरण यांनी माझ्याशी लग्न करताना धर्म बदललेला नाही. आमची लग्ने सिव्हिल मॅरेज होती. गौरी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. मात्र ती धर्माचे कठोर पालन करणारी नाही. काळ जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आयुष्य अधिक सुंदर आणि रंजक होत आहे."
दरम्यान, मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिल परिसरात १०० कोटी रुपयांची मल्टी-जनरेशन स्कायव्हिला उभारल्याच्या चर्चांवरही आमिरने स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, "आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास सुरू आहे. हा निर्णय माझ्यासह एकूण २४ सदस्यांच्या गृहनिर्माण संस्थेने घेतला आहे. या प्रकल्पात एका बिल्डरचाही सहभाग असून त्याच्याकडे इमारतीतील मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स असल्यामुळे त्याचा मोठा हिस्सा आहे."
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ता सोबत झाले होते. या विवाहातून त्यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. त्यानंतर त्याने किरण राव हिच्याशी विवाह केला या नात्यातून त्यांना आझाद हा मुलगा आहे. ५ जुलै रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत आमिरने उद्योगपती गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसरे लग्न केले. गौरी स्प्रॅटचाही हा दुसरा विवाह असून तिच्या पहिल्या लग्नातून सात वर्षांचा मुलगा आहे. आमिरच्या या विवाहानंतर सोशल मीडियावर आणि काही संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, त्यावर आता आमिरने स्पष्टीकरण दिले आहे.