3 Idiots 2 Update: बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘3 इडियट्स’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 17 वर्षांनंतर या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल येण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘3 इडियट्स 2’ संदर्भात महत्त्वाची माहिती उघड केली आहे.
2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नव्हता, तर शिक्षण व्यवस्था, मैत्री आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर भाष्य करत लाखो प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.
‘3 इडियट्स’च्या सिक्वेलमध्ये नवीन पात्रे असतील की जुनीच पात्रे असतील, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. यावर उत्तर देताना राजकुमार हिरानी यांनी स्पष्ट केले की, रँचो, फरहान आणि राजू ही तिन्ही मुख्य पात्रे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
मात्र यावेळी कथा कॉलेजच्या दिवसांतील नसेल. चित्रपटात ‘टाइम लीप’ दाखवला जाणार आहे. म्हणजेच पहिल्या भागानंतर जवळपास 20 वर्षांनी या पात्रांच्या आयुष्यात काय बदल झाले, ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
रँचो आता कुठे आहे? फरहानच्या फोटोग्राफीच्या स्वप्नाचं काय झालं? राजूच्या आयुष्यात काय घडलं? त्यांचे करिअर, कुटुंब, लग्न आणि पुढील आयुष्य कसं घडलं, याभोवती कथा फिरणार असल्याची माहिती हिरानी यांनी दिली.
राजकुमार हिरानी यांनी सांगितले की सध्या चित्रपटाची स्क्रिप्ट अजून प्राथमिक टप्प्यात आहे. लेखक अभिजात जोशी यांच्यासोबत ते कथानकावर काम करत आहेत.
विशेष म्हणजे, या चित्रपटाचा सुरुवातीचा ड्राफ्ट आमिर खान यांना ऐकवण्यात आला असून त्यांना तो आवडल्याचंही हिरानी यांनी सांगितलं. मात्र अंतिम पटकथा तयार होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहेत. हिरानी यांच्या मते, पुढील दोन महिन्यांत स्क्रिप्टबाबत अधिक स्पष्टता येईल आणि त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगबाबत निर्णय घेतला जाईल.
‘3 इडियट्स’मध्ये आमिर खानने रँचो, आर. माधवनने फरहान आणि शरमन जोशीने राजू यांची भूमिका साकारली होती. याशिवाय करीना कपूर खान आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
सुमारे 55 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात 202 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तर जगभरात चित्रपटाने 350 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवत त्या काळात विक्रमी यश मिळवले होते.
‘3 इडियट्स’ हा फक्त चित्रपट नव्हता, तर एका पिढीच्या भावना आणि आठवणींशी जोडलेला अनुभव होता. त्यामुळे सिक्वेलची घोषणा होताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
रँचो, फरहान आणि राजू यांची पुढची कहाणी नेमकी कशी असेल, याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. जर सर्व काही प्लॅननुसार झाले, तर येत्या काही वर्षांत ‘3 इडियट्स 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.