मुंबई; पुढारी ऑनलाईन : Lakhimpur Kheri Violence : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या संघर्षात नऊजणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना चिरडणे हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
लखीमपूर घटनेने ( Lakhimpur Kheri Violence) देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना चिरडणे, त्यांचा आवाज दडपणे हे भाजपचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत धोरण आहे का? असे राऊत यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांना तेथे जाण्यास बंदी घातली आहे. प्रियांका गांधी यांना का रोखलं?. ही कोणती लोकशाही? हे ब्रिटीश राज आहे का? असे सवाल करत त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
काही जणांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही. दुसऱ्याचे लोक घेणे हे फार काळ चालत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे हेलिपॅडवर सुरू झालेल्या शेतकरी धरणे आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. यावेळी अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली. काही गाड्या पेटवण्यात आल्या. या हिंसाचारात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष मिश्रा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलक शेतकर्यांवर गाडी घालून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या हेलिपॅडवर शेतकर्यांनी रविवारी सकाळपासून कब्जा केला होता. दुपारी पावणेतीन वाजता दोन्ही नेत्यांचा काफिला तिकोनिया चौकातून गेला तेव्हा शेतकरी काळे झेंडे घेऊन त्यांच्या दिशेने धावून आले.
यादरम्यान अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक मिश्रा ऊर्फ मोनू याने आपली गाडी शेतकर्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकर्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. शेतकर्यांनी मोनू यांच्या गाडीसह अनेक गाड्यांची जाळपोळ, तोडफोड केली. या हिंसाचारातील मृतांचा आकडा ९ वर गेला आहे.
पहा व्हिडिओ : जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं.. | Swami Motors |Pre-owned Cars