विश्वचषकात विजयाने भारतीय एकच जल्लोष केला Pudhari File Photo
संपादकीय

तडका : आनंदाला उधाण!

विश्वचषकामधील विजयाने भारतीयांच्या उंचावल्या अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

अत्यंत उत्कंठेच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवून सुमारे 17 वर्षानंतर टी-20 चा विश्वचषक जिंकला. या विश्वचषकमधील सर्व सामने भारतीय नागरिकांनी अत्यंत आनंदाने आणि आवडीने पाहिले आहेत. विजयी झालेली भारतीय टीम आणि समोर प्रतिस्पर्धी म्हणून एकही सामना न हरलेली दक्षिण आफ्रिकेची टीम असा चुरशीचा सामना झाला.

एखादा झेल किती महत्त्वाचा असतो आणि त्या वेळेला प्रसंगावधान किती गरजेचे असते, हे सूर्याने अप्रतिम झेल पकडून दाखवून दिले आहे. खूप उंचावरून मारलेला फटका आणि त्याच वेगाने खाली येणारा चेंडूच्या दिशेने धावताना तो सीमारेषेच्या जवळ गेला होता. सेकंदाच्या काही भागांची चूक झाली असती, तरी हा सामना भारताच्या हातातून निघून गेला असता. सूर्याने तो झेल धावत धावत पकडला, हातातील चेंडू मैदानावर भिरकावून दिला आणि पळण्याच्या वेगात नंतरच त्याने सीमारेषा पार केली. त्याने असे केले नसते तर किंवा तो चेंडू हातात घेऊन त्याने सीमारेषा पार केली असती तर तो षटकार ठरला असता आणि भारताच्या हातातून सामना पाहता पाहता निसटून गेला असता. आपल्या सुदैवाने तसे काही झाले नाही आणि त्याच क्षणी हा सामना भारताच्या दिशेने 360 अंशांच्या कोनातून फिरला. याच ठिकाणी भारतीय प्रेक्षकांना विजयाचा अंदाज आला आणि त्यांनी देशभर एकच जल्लोष केला. मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर लहान शहरांमध्येही लोक घराबाहेर पडले आणि नाचून जल्लोष करत फटाके फोडून त्यांनी आनंद व्यक्त केला.

क्रिकेट हा एक अद्भुत खेळ असून, भारतीय लोकांना त्याची प्रचंड आवड आहे, हे पूर्वीच सिद्ध झाले आहे. भारतामधील प्रखर राष्ट्रवाद क्रिकेट सामना जिंकल्यानंतर पाहायला मिळतो, हे महत्त्वाचे आहे. या वेळच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानातही भारताचा विजय साजरा करण्यात आला. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी अनेक भारतीय खेळाडूंचे फॅन आहेत, हे आपल्याला माहीत आहे. अशी निरपेक्ष खिलाडूवृत्तीची भावना दोन देशांमध्ये क्रिकेटच्या निमित्ताने का होईना, वाढायला लागली आहे, हे चांगले लक्षण आहे. या भावनेचा बहर वाढत गेला तर उद्या चालून दोन्ही देश एकमेकांच्या जवळ येऊ शकतील, अशी शक्यता पण निर्माण झाली आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काश्मीरमध्येही भारतीय झेंडे फडकावले गेले आणि भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला गेला. काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू बदलत असताना हा विजय साजरा करणे हे एक चांगले लक्षण आहे. आपण संपूर्ण भारताबरोबर आहोत, हे काश्मिरी लोकांनी शनिवारी दाखवून दिले, हे या क्रिकेट सामन्याचे महत्त्वाचे योगदान आहे.

सध्या फॉर्मात असणार्‍या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन आघाडीच्या क्रिकेटपटूंनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेणे भल्याभल्यांना जमत नाही; परंतु या दोन दिग्गज खेळाडूंनी या सामन्यामध्ये विजय मिळवून टी-20 च्या मैदानातील शेवटचा सामना संस्मरणीय ठरवला. ज्येष्ठ खेळाडू योग्य वेळी बाजूला झाले तरच नवीन खेळाडूंना संधी मिळत असते आणि नवीन नेतृत्व तयार होत असते. राजकारणी लोकांनी क्रिकेटपटू मंडळींकडून हा धडा घेतला तर फार चांगले होईल, असे तुम्हा-आम्हा सर्वसामान्य लोकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT