पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Ajit Pawar Meets Sharad Pawar)
चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीत अशा घडामोडी घडत राहिल्यास जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, पक्षामध्ये काय चालले आहे, हे दोघांनी सांगितले पाहिजे. जनतेमधील संभ्रम दूर केला पाहिजे. अजित पवार यांच्यासोबत बहुसंख्येने आमदार गेल्याने कदाचित शरद पवार यांनी आपली भूमिका बदललेली असेल, असेही चव्हाण म्हणाले. (Ajit Pawar Meets Sharad Pawar)
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलं आहे.
शरद पवार हे शनिवारी पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्कमध्ये व्यावसायिक चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे. शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीची बातमी माध्यमांना कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा