पिंपरी: अजितदादा हयात असते, तर भाजपने पुणे विधान परिषदेवर हक्क दाखवण्याची हिंमत केली नसती, असे खळबळजनक वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढण्यास इच्छुक असणारे योगेश बहल यांनी मंगळवारी केले आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
पुणे विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण होणार नाही, असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात असला तरी योगेश बहलांच्या वक्तव्यामुळे राजकीय पडद्यामागे रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा काबीज करुन पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे भाजपचे मनुसबे आहेत. प्रत्येक निवडणुकीत या-ना त्या कारणाने भाजप हा मनसुबा पूर्ण करण्याच्यादृष्टीने पावले टाकत आहे. पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने योगेश बहलांनी या राजकीय वास्तवाकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवल्याचे बोलले जात आहे.
भाजप-राष्ट्रवादीत खटके उडण्याची शक्यता
अजितदादांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. भाजपकडून त्यांचा फायदा घेऊन, दबावतंत्राचे राजकारण खेळले जात आहे. कदाचित भाजपाचा असा प्रयत्न असू शकतो, हे नाकारता येणार नाही, असे म्हणत योगेश बहल यांनी नव्या राजकीय चर्चेला हवा दिली आहे. मात्र, असे असले तरी सुनेत्रा पवार खंबीर आहेत.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक व सदस्य संख्या सर्वांधिक आहे. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. त्या पुणे विधान परिषदेची आमच्या हक्काची जागा राष्ट्रवादीलाच मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, योगेश बहल यांच्या या वक्तव्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधात असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीत खटके उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.