वल्लभनगर: वल्लभनगर एसटी आगारातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या प्रचंड गैरसोयीवर दैनिक पुढारीने प्रकाश टाकताच एसटी प्रशासनाने तातडीने दखल घेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
एकाच कर्मचाऱ्यावर संपूर्ण नोंदणीचा भार असल्याने नागरिकांना पाच-पाच तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, पूर्वी असलेल्या एका मशीनऐवजी आता दोन संगणकीय मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला वेग आला असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एनसीएमसी कार्डासाठी पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, भोसरी, निगडी, मोशी, चिखली, दिघी, तळेगाव आदी परिसरातील नागरिक दररोज मोठ्या संख्येने वल्लभनगर आगारात येत आहेत. वाढत्या गर्दीच्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, गर्भवती महिला आणि रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती. या संपूर्ण परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
प्रवाशांना दिलासा
नोंदणी प्रक्रियेसाठी मनुष्यबळाची वाढ करण्यात आली असून, आता एकऐवजी दोन मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. प्रतीक्षेचा कालावधी कमी होऊन नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. दैनिक पुढारीने लोकहिताचा प्रश्न ठामपणे मांडल्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्याने आगारातील व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक सुरळीत झाली आहे.
नोंदणी प्रक्रियेला गती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाने उचललेल्या या पावलांचे स्वागत होत आहे. तथापि, भविष्यात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि रुग्णांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करणे, टोकन व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणणे आणि कार्ड वितरणाची प्रक्रिया अधिक जलद करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.