पिंपरी: मावळ तालुक्यातील शिरदे धरणात बुडून सुस येथील आयएसबीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकीचा पाण्यात तोल गेल्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेला तरुणही बुडाल्याची घटना रविवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
करण ज्ञानदेव ढोबरे (20, रा. बालाजी विहार, कोडोली, जि. सातारा) आणि आर्या सुशांत बंडावार (वय 20, रा. गोंदिया) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुजल प्रकाश पवार (वय 19, रा. सुसगाव, ता. मुळशी, मूळ रा. धुळे) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल पवार तिच्या चार मैत्रिणी आणि करण ढोबरे असे सहाजण रविवारी राजमाची किल्ल्यावर फिरण्यासाठी निघाले होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास ते शिरदे धरण परिसरात पोहोचले. त्या वेळी त्यांनी राजमाचीला जाण्याचा प्लॅन रद्द करून धरण परिसरातच फिरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वजण धरणाच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसले होते.
दोघांनाही येत नव्हते पोहता
दरम्यान, आर्या बंडावार आणि तिची मैत्रीण ज्योत्स्ना शेळके या दोघी पुढे बसण्यासाठी पाण्याच्या दिशेने गेल्या. काही वेळातच ज्योत्स्ना हिने वाचवा... वाचवा... अशी आरडाओरड सुरू केली. पाण्यात तोल जाऊन आर्या बुडत होती. ज्योत्स्ना तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. आर्या बुडत असल्याचे पाहून करण ढोबरे याने तत्काळ धरणात उडी मारली. मात्र, त्यालाही पोहता येत नसल्याने तोदेखील पाण्यात बुडू लागला. हा प्रकार पाहून परिसरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले.
कॉलेज परिसरात हळहळ
घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आर्या आणि करण यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांना तातडीने कामशेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आयएसबीएम कॉलेज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास कामशेत पोलिस करीत आहेत.
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; तिघांना अटक
एका खासगी गाडीतून कत्तलीसाठी जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी (दि. 17) पहाटे साडेतीनच्या सुमारास देहूरोड येथील शितळा देवी मंदिराजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस हवालदार संपत सिरसाट यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश धनराज द्रविड (36, रा. देहूरोड), स्वरूप बरनाबोस मुनगंडा (26, रा. देहूरोड) आणि सूर्याबा झेडे (28, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी एका चारचाकी गाडीतून चार जर्सी गोवंश दोरीने निर्दयीपणे बांधून कत्तलीसाठी घेऊन जात होते. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना अत्यंत कमी जागेत त्यांना कोंडण्यात आले होते. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.