पिंपरी: नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर पालकांना अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. आखाती युद्ध, इंधन दरवाढ आणि वाढलेल्या वाहतूक खर्चाचा परिणाम शालेय साहित्यावरील सवलतींवर झाला आहे. त्यामुळे शालेय साहित्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अभ्यासक्रमपूरक पुस्तके, सराव संच, वह्या, दप्तर, चित्रकला साहित्य, पेन-पेन्सिल यासह इतर स्टेशनरीच्या किंमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या आर्थिक गणिते बिघडली आहेत.
कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम
साहित्याच्या छापील किमती कायम असल्या तरी त्यावरील सवलत कमी झाल्याने पालकांना यंदा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आखाती युद्धामुळे शैक्षणिक साहित्याच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कागदापासून तयार होणाऱ्या साहित्याच्या उत्पादन खर्चात 10 ते 15 टक्के तर, प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या दप्तर, फाइल, कव्हर आणि अन्य साहित्यांच्या उत्पादन खर्चात 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मात्र, बहुतांश साहित्यांचे बुकिंग आणि उत्पादन काही महिन्यांपूर्वीच झाल्याने त्यांच्या छापील किमतीत बदल झालेला नाही. तथापि, वाढलेला वाहतूक आणि वितरण खर्च लक्षात घेता, पूर्वीप्रमाणे सवलत देणे शक्य नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी, शैक्षणिक साहित्यांवरील छापील किंमत कायम असली तरी सवलतीत कपात झाल्याने पालकांचा प्रत्यक्ष खर्च वाढणार आहे.
सराव संचांवरील सवलत बंद
अभ्यासक्रमपूरक पुस्तके आणि सराव संचांवर मिळणारी सुमारे 10 टक्के सवलत यंदा अनेक ठिकाणी बंद करण्यात आली आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांवर मिळणारी 20 ते 25 टक्के सवलत घटून सुमारे 10 टक्क्यांपर्यंत आली आहे. दप्तर, चित्रकला साहित्य, पेन, पेन्सिल आणि अन्य शैक्षणिक साहित्यांवरील सवलतींतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे साहित्यांच्या छापील किमती वाढलेल्या नसल्या तरी पालकांना गतवर्षीपेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे.
युद्धामुळे सर्वच गोष्टींची दरवाढ झाली आहे. यामध्ये इंधन दरवाढ आणि वाहतूकखर्च वाढला आहे. त्यामुळे शालेय साहित्यांचे दरदेखील 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत.शिवाजी घोडके, स्टेशनरी दुकानदार