पिंपरी: इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आता देशातील सर्वसामान्य नागरिकांवर होऊ लागला आहे. गॅसचा तुटवडा, इंधन दरात होणारी सततची वाढ यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच स्कूल बसच्या दरात साधारण 30 ते 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
इंधन दरवाढीचा फटका आता प्रत्यक्षपणे पालकांच्या खिशाला बसणार आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे; परंतु गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल - डिझेलच्या दरांचा थेट फटका स्कूल बसच्या दरावर होणार आहे. डिझेल, ऑइल आणि देखभाल दुरुस्तीचे खर्च वाढल्यामुळे स्कूल बस, रिक्षा चालविण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, रिक्षाचालकांकडून 30 ते 40 टक्के बस, रिक्षा भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. आधीच वाढलेल्या शैक्षणिक शुल्कामध्ये आता स्कूल बस, रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार पालकांच्या मानगुटीवर बसली आहे.
उन्हाळ्याची सुटी संपून नवीन शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवण्यासाठी मुले उत्सुक आहेत. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या 1 जून रोजी नवीन शैक्षणिक सत्र सुरू करत आहे. तसेच महाराष्ट्र महामंडळाच्या शाळा नेहमीप्रमाणे जून 2026 पासून सुरु होणार आहे. शाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सात ते आठ रुपये वाढ झाली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे डिझेलच्या किमती शंभरी गाठणार आहे. परिणाम स्कूल बसचालकांच्या दैनदिन खर्चात वाढ होणार आहे. वाहनांचे सुटे भाग, विमा आणि आरटीओ कर यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. अनेक शाळा दोन सत्रांत सुरू असल्याने अनेक बसचालकांना दिवसातून चार वेळा फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे इंधनाचा वापर आधिक प्रमाणात वाढतो. यामुळे स्कूल बसच्या मासिक व वार्षीक दरात वाढ करणे बंधनकारक होणार आहे. यामुळे पालकांना शाळेच्या खर्चाबरोबरच ट्रॅव्हलिंगचा देखील खर्च वाढल्याने आर्थिक फटका बसणार आहे.
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात मुलांच्या शाळेची फी, पुस्तकांचा वाढता खर्च, त्यात आणखी भर म्हणजे आता व्हॅन, रिक्षा, स्कूलबसच्या वाहतूक दरात बसचालकांकडून वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारने ही दरवाढ रोखण्यासाठी उपाययोजना करावी.शोभा बंब, पालक.
इंधन दरवाढीमुळे स्कूल बसला चांगलाच फटका बसणार आहे. त्यामुळे दोन सत्रात शाळा असतात त्यामुळे चार फेऱ्या होतात. त्यात शहरातील वाढती वाहतूक कोंडीमुळे खूप इंधन जळते. त्यामुळे मिटींगनुसार 30 ते 40 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे.सोहम परदेशी, स्कूलबस मालक