Swimming Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Safety Awareness: पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाळी सुट्यांदरम्यान जलविहार धोकादायक; पालकांना सतर्कतेचे आवाहन

नदी, विहिरी व खाणींमध्ये वाढत्या अपघातांमुळे प्रशासनाचे नागरिकांना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शाळकरी मुलांना उन्हाळी सुट्या सुरू आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अनेकजण सुटी धमाल करण्यासाठी जलविहारासाठी नदीपात्र, विहिरी अथवा खाणींवर पोहण्यासाठी गर्दी करतात. मात्र, अतिउत्साहाच्या भरात अनोळखी ठिकाणी पोहणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पोहण्याचा आनंद घेताना बच्चे कंपनीवर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे नदीपात्र, विहिरी तसेच खाणीच्या ठिकाणी गर्दी होत आहे. अनेक जण धाडस करण्याच्या नादात आपल्या जीवाला मुकले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत 25 आणि मावळ तालुक्यात 38 जणांचा पाण्यात बुडून मृत्यृ झाल्याची नोंद आहे. क्षणिक पोहण्याच्या आनंदासाठी पाण्यात उतरणाऱ्या तरुणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे अनेक जण निष्काळजीपणा करत असल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या उन्हाळी सुटीमुळे बच्चे कंपनीस मोकळा वेळ मिळाला आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात घराबाहेर पडून नदीकाठ, विहिरीत पोहण्यासाठी उतरतात. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज तसेच तळ माहिती नसल्याने पाण्याखालील खड्डे यांचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा पोहता न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा, पवना, आणि इंद्रायणी नदीकाठ तसेच विविध भागांतील दगडाच्या खाणी परिसरात अनेक जण आपल्या पालकांना कल्पना न देता पोहण्यासाठी जातात, परंतु पोहायला जाण्याचा मोह अनेकांच्या अंगलट येत असून, चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. पोहायला जाण्यापूर्वी परिसराची किंवा तेथील विहिराच्या पाण्याची खोली न ओळखणे, प्रवाहाचा अंदाज न येणे, तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेचे साधन नसणे हे मृत्यू ओढवण्याचे मुख्य कारण ठरत आहे. अनेकदा पोहता येत नसतानाही तरुण खोल पाण्यात उतरतात. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते.

जलतरणाचे शुल्क परवडत नाही

अनेकांना जलतरण तलावाचे शुल्क परवडत नसल्याने नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी पोहण्यास जातात. मात्र, या ठिकाणी पोहणे किती धोकादायक ठरू शकते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. नदीपात्रातील गाळ , विहिरीची अनिश्चित खोली, खाणीतील साचलेले पाणी अत्यंत धोकादायक आहे. याकडे लक्ष न देता पाण्यात उड्या मारल्या जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे.

अशी घ्या काळजी

  • खाणीतील साचलेल्या पाण्यात जाऊ नये

  • पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास सावधगिरी बाळगा

  • एकटे पोहायला जाणे टाळा

  • उंचावरून पाण्यात उड्या मारू नये

अनेक जण पोहण्यासाठी अनोळखी ठिकाणांचा शोध घेतात. जलतरण तलावाची खोली तेथील जीवरक्षकांना माहिती असते. मात्र, नदीपात्र तलाव यांची खोली माहिती नसते. तसेच, त्याठिकाणी गाळ साचलेला असू शकतो. त्यामुळे अशा अनोळखी ठिकाणी पोहण्यास जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
निलेश गराडे, संस्थापक वन्यजीव रक्षक
नागरिकांनी माहिती असलेल्या ठिकाणीच पोहण्यास जावे. पोहण्यास गेल्यानंतर तेथील स्थानिकांकडून पाण्याच्या प्रवाहाची तसेच पात्र याची माहिती घेणे गरजेचे आहे. माहिती नसल्या अशा अनोळखी ठिकाणी पोहणे धोक्याचे ठरू शकते.
शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT