पिंपरी: मावळ तालुक्यातील पवना धरणात केवळ 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 19) केले आहे.
पाणीटंचाईच्या तक्रारींत मोठी वाढ होण्याची शक्यता
ऐन उन्हाळ्यात अनेक भागांत पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. महापालिकेचा सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांसह विरोधी नगरसेवकांनी अपुर्या पाणीपुरवठ्यावर प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यात आता आणखी 15 टक्के पाणीकपात केली जाणार असल्याने नागरिकांना आणखी कमी पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या तक्रारींत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राधिकरण, निगडी परिसरात चोवीस तास पाणी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 24 तास पाणी देण्याची प्रायोगिक तत्त्वावरील योजना प्राधिकरण, निगडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. संपूर्ण शहराला पाणी मिळत नसले तरी चालेल; मात्र त्या भागांत 24 तास पाणी दिले जाते. ऐन उन्हाळ्यातही त्या भागात दिवस-रात्र पाणीपुरवठा कायम आहे. तेथील पाण्याचे दरही संपूर्ण शहराप्रमाणे आहेत. पाणीदर समान असताना त्या भागांत 24 तास पाणीपुरवठा कोणत्या नियमानुसार केला जातो, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जाात आहे.
नागरिकांनी पाण्याची नासाडी करू नये
प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर करणे ही काळाची गरज आहे. पाण्याची गळती तात्काळ दुरुस्त करावी. घरातील नादुरुस्त व गळके नळ दुरुस्त करून घ्यावे. नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी शिळे म्हणून दुसर्या दिवशी फेकून देऊ नये. घरगुती पातळीवर पाणी बचतीच्या सवयी अंगीकारावी. जमिनीवरील व गच्चीवर पाण्याच्या टाक्यातून भरून पाणी वाहू देऊ नये. अंगण, रस्ते, जिने, वाहन पाण्याचे धुवू नयेत. उद्याग, बाग, कुंड्यांना पिण्याचा पाणी देऊ नये.
साडेसहा वर्षांपासून दिवसाआड पाणी
शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, म्हणून 25 नोव्हेंबर 2019 पासून संपूर्ण शहराला दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. तो निर्णय तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला होता. दोन दिवसांतून एक वेळ पाणी देण्याची पद्धत अद्याप सुरू आहे. गेल्या साडेसहा वर्षांपासून शहराला दोन दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर या तक्रारींत मोठी वाढ झाली आहे. तर, संपूर्ण शहराला एकाच दिवशी पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची क्षमता नसल्याचे चित्र आहे.
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडून निर्बंध
जलतरण तलाव भरण्यासाठी किंवा देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद
हाऊसिंग सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांच्या संगोपनासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी पुनर्वापरित पाण्याचा वापर करावा
वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये
पाणीकपातीच्या कालावधीत नवीन जलजोडणी नाही
विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात येणार
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये केवळ 19 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे आगामी कालावधीतील पाण्याची उपलब्धता आणि वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर व नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शहरातील पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करण्यात आली आहे.प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
पवना धरणात उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, नळ विनाकारण सुरू ठेवणे, गळती यांसारख्या बाबी टाळून पाणी बचतीत सक्रिय सहभाग नोंदवावा. पाण्याची बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणी बचतीचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे.विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका