पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. एजंटांचा उघडपणे सुरू असलेला वावर, गुटखा आणि सिगारेटची सर्रास विक्री, तसेच रस्त्यांवर अतिक्रमण करून उभारलेली दुकाने यामुळे संपूर्ण परिसराला अव्यवस्थेचे ग््राहण लागले आहे. या सगळ्या प्रकारांमुळे वाहनचालक आणि नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, प्रशासन मात्र या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एजंटांचा सुळसुळाट
आरटीओ कार्यालयात अधिकृत कामे सहज आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत, अशी अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात एजंटांची चलती दिसून येते. कार्यालयाबाहेरच एजंटांची गर्दी दिसून येते. नागरिकांना फसवून जादा पैसे उकळण्याचे प्रकार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
प्रशासनाची डोळेझाक?
या सर्व प्रकारांबाबत वाहतूक विभाग, महापालिका आणि संबंधित प्रशासन यांची भूमिका संशयास्पद वाटते. अवैध विक्रेत्यांवर नियंत्रण नाही, एजंटांच्या कारवायांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांकडून मागणी
रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे
अधिकृत पार्किंगची व्यवस्था करावी
गुटखा, सिगारेट विक्रीवर बंदी लागू करावी
एजंटांवर कठोर कारवाई करावी
परिसरात नियमित पोलिस गस्त वाढवावी.
प्रशासनाच्या कार्यक्ष्ामतेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड आरटीओ परिसरातील वाढती अव्यवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून, ती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. जर वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खुलेआम गुटखा विक्री
आरटीओ परिसरात गुटखा, आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री खुलेआम सुरू आहे. विशेष म्हणजे, ही विक्री अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून केली जात आहे.
रस्ते झाले अरुंद
आरटीओ कार्यालयाबाहेर रस्त्यांवरच एजंटांनी आणि विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले आहे. पदपथ रस्त्यांचा भाग व्यापून बसलेल्या या अनधिकृत दुकानांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. रस्ते अरुंद झाल्याने वाहनांची सतत कोंडी होत आहे. पार्किंगसाठी जागेचा अभाव दिसत आहे. तसेच, पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
वाहन पार्किंगचा गंभीर प्रश्न
आरटीओ कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. वाहनांची संख्या मोठी असतानाही पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. रस्त्यांवरच वाहन उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूककोंडी वाढते. या परिस्थितीमुळे अनेक वेळा किरकोळ वाद आणि अपघात घडत असल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जाते.