LPG Gas Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad LPG Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाई; खाद्यतेल व सुकामेवा महाग

सिलिंडरसाठी 10-15 दिवस प्रतीक्षा; गुढीपाडवा-रमजानपूर्वी महागाईची झळ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील विविध गॅस एजन्सींसमोर ग््रााहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून, अनेकांना बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार ग््रााहकांकडून होत आहे. या तुटवड्याचा सर्वाधिक फटका घरगुती ग््रााहकांसोबतच हॉटेल व्यावसायिक, खाणावळी, शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना आणि रुग्णालयांमधील अन्नपुरवठ्यावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. घरगुती गॅसच्या दरात साठ रुपयांची तर व्यावसायिक गॅसच्या दरात 115 रुपयांची वाढ झालेली आहे.

सिलिंडर बुकिंगनंतर 10 ते 15 दिवसांची प्रतीक्षा

घरगुती गॅस ग््रााहकांना बुकिंग केल्यानंतरही लगेच सिलिंडर मिळत नाही. अनेकांना बुकिंग केल्यापासून किमान दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. या विलंबामुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. काही कुटुंबांनी तात्पुरत्या स्वरूपात इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. गृहिणींना दररोजच्या स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही घरांमध्ये सिलिंडर संपण्याच्या भीतीने स्वयंपाक मर्यादित करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.

महाविद्यालयीन परिसरातील खाणावळी चालक अडचणीत

शिक्षणाच्या शोधात देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी पिंपरी-चिंचवड शहरात येतात. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी खाणावळी सुरू आहेत. आकुर्डी, रावेत, चिंचवड, पिंपरी आणि वायसीएम परिसरात विद्यार्थ्यांच्या मेस मोठ्या प्रमाणावर चालतात. व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने या खाणावळ चालवणाऱ्या व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेकांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या वेळा कमी केल्या आहेत. काहींनी तात्पुरत्या स्वरूपात खाणावळ बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे शहरात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

हॉटेल, खाद्य व्यवसायावर मोठा परिणाम

गॅसच्या तुटवड्यामुळे शहरातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा काही ठिकाणी तात्पुरता बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक हॉटेलचालकांनी स्वयंपाकासाठी पर्यायी उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. तर काही हॉटेलांनी मेनू मर्यादित करून फक्त ठराविक पदार्थच देण्याचा निर्णय घेतला आहे. काही हॉटेलांनी स्पेशल ऑर्डर बंद करून फक्त थाळी पद्धतीने जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी सर्व ग््रााहकांसाठी एकच भाजी आणि ठराविक मेनू देऊन गॅसचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही हॉटेलचालकांनी तर दिवसातून फक्त एकाच वेळेस हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग््रााहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण आहेत. व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आणखी आठवडाभर व्यावसायिकांना गॅस मिळाला नाही, तर खाऊ गल्ल्या बंद होतील. हॉटेलही बंद राहतील. त्यामुळे कामानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या नागरिकांची उपासमार होईल.
मानव कांबळे, एलपीजी गॅस वितरक

अमेरिका - इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहेत. इराणमधून होणारी आयात ठप्प झाल्याने सुकामेवा महाग झाला आहे. तसेच तेलाच्या किंमती वाढल्याने गुढीपाडवा आणि रमजान ईद या सणासुदीच्या दिवसात ग््रााहकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भारतात खाद्यतेलाचे भाव आठवड्याभरात किलोमागे सुमारे 10 रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. कच्च्‌‍या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे महागाईचा फटका बसला आहे.

पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने लोक जास्त साठा करत आहेत. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलासह सुका मेवा, खजूर आणि डाळीदेखील महागल्या आहेत. युद्धामुळे वाहतूक खर्च वाढल्याने सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात खाद्यतेल, सुकामेवा आदींच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुरवठा खंडित होण्याची आणि युद्धामुळे किमती आणखी वाढण्याची भीती असल्याने लोक अधिक तेल खरेदी करत आहेत. घाऊक बाजारातील हा बदल किरकोळ किमतींमध्ये दिसून येत आहे.

तर दुसरीकडे भारतात आखाती देशांतून खजूर आयात केला जातो. यामुळे बाजारपेठेत खजूरच्या किमतीत 10 ते 15 टक्कयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे पुरवठा होण्यास अडचण होत असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. त्यातच गॅस सिलिंडरची दरवाढ आणि टंचाई असताना पुन्हा खाद्य तेल आणि सुकामेवा महाग झाला आहे. गुढीपाडव्यामध्ये श्रीखंडासाठी सुक्यामेव्याला मागणी असते; तसेच पुरणपोळीऐवजी पुरीचा बेत असतो. त्यामुळे सणासुदीला नागरिकांना महागाईची झळ लागणार आहे.

सुकामेव्याच्या दरात वाढ झाली आहे; तसेच लिटरमागे खाद्य तेलाचे भाव दहा रुपयांनी वाढले आहेत. आमच्याकडील शिल्लक मालाचे दर अद्याप स्थिर आहेत; परंतु नवीन माल आल्यानंतर किंमती वाढण्याची शक्यता आहे.
हुसेन शेख (किराणा दुकानदार)
गेल्या आठ दिवसांमध्ये काजू 1000 रुपये, बदाम 1100 रुपये तर पिस्ता 2800 रुपये झाले आहेत. सुकामेव्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. इराणमधून विविध प्रकारचे खजूर येतात. यामध्ये मगजोल 1200, फरद 700 रुपये, रुक्साना 600-700, जास्मिन 900 रुपये यांचे दर शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहेत.
मनोहर जेठवानी (ड्रायफुट विक्रेते)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT