पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात शनिवार (दि. ४) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. गेले सलग तीन दिवसांपासूण सुरू असलेल्या पावसाने शहर परिसरातील सखल भागात पाणीच पाणी केले. पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळीदेखील वाढली आहे. त्यामुळे शहरातील केजुदेवी आणि रावेत बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. गेल्या २४ तासांत ३७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी दिवसभर तसेच शनिवारीही सुरू असलेल्या संततधारेमुळे चाकरमान्यांची कामाचे ठिकाण गाठताना मोठी धावपळ झाली; तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांचीदेखील मोठी धांदल उडाल्याचे चित्र होते. तसेच शाळा सुटतानादेखील विद्यार्थ्यांना भिजत घरी जावे लागले. पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
शहर परिसरात दिवसभर पावसाच्या सरींनी बरसणे सुरूच ठेवले होते. गेले दोन महिने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना सलग तीन दिवसांच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे; मात्र असे आल्हाददायक वातावरण असताना शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली आहे. तात्पुरती मलमपट्टी केल्याने खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पाणी साचलेल्या भागातून जाताना दुचाकी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. पाऊस आणि गारठा यामुळे नागरिकांनी चहा, कॉफीसारखे गरम पेय घेऊन आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. संततधार पावसामुळे अनेकांचे कामानिमित्त तसेच खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचे बेत रद्द झाले. शनिवारची सुटी असली तरी नागरिकांनी घरात राहणे पसंत केले.
पवना धरणात २१ टक्के साठा
मावळातील पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. धरणात पाणीसाठा वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. शनिवार (दि. ४) सायंकाळी पाचपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढून तो २१ टक्के इतका झाला आहे. गेले तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुका परिसरात पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत एकूण ३६० मिलीमीटर पाऊस पडला आहे.