पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याने हैराण झाले आहेत. जून महिना उजाडल्यामुळे आतातरी उन्हाची तीव्रता कमी होईल, अशी आशा असताना उन्हाच्या चटक्याने नागरिकांना नकोसे झाले आहे. मधूनच ढगाळ वातावरणामुळे आणि उष्ण हवेमुळे दिवस-रात्र घामाघूम अशी अवस्था होत आहे.
यंदा पाऊस लांबल्यामुळे जून महिन्यातदेखील उकाडा असणार असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना कधी पाऊस पडेल अशी आशा लागून राहिली आहे. दररोज तापमान 35 ते 36 अंशाच्या दरम्यान असूनही 40 अंशा इतका उकाड्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. रात्रीचे तापमानदेखील जास्त असल्याने रात्रीही घामाच्या धारा अशी परिस्थिती असल्याने नागरिकांना डिहायड्रेशन आणि त्वचेसंबधी विकारांचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या उकाड्यामुळे घरात आणि कार्यालयातही वातानुकुलित यंत्रणेचा वेग वाढलेलाच आहे. कामाच्या ठिकाणी दिवसभर एसीमधून बाहेर आल्यानंतर बाहेरच्या तापमानाचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे उलटी, मळमळ, चक्कर येणे अशा विकारात वाढ झाली आहे.
उन्हामध्ये कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांचे आणि उन्हामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. उन्हात जाताना नागरिकांना टोपी, गॉगल, सनप्रूफ जॅकेट, मास्क, हातमोजे, स्कार्फ, छत्री अशी सुरक्षा साधने घेऊनच बाहेर पडत आहेत.
उन्हामुळे शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, भाजी मंडई अशी गजबजलेली ठिकाणे ओस दिसू लागली आहेत. नागरिक सायंकाळी ऊन उतरल्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. उन्हामुळे ग्राहक नसल्याने काही दुकानदार दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवत आहेत.
दिवभर फिरून काम करणारे नागरिक दुपारी रस्त्याच्याकडेला सावलीत झाडाखाली विसावा घेताना दिसत आहेत. उन्हाचा प्राण्यांवरदेखील परिणाम होत आहे. भटकी जनावरे, कुत्री, मांजरे हे प्राणीदेखील सावलीचा आधार घेत आहेत.
कुलर, एसीच्या वापरात वाढ
सध्याच्या उकाड्यामुळे फॅनमुळे मिळणारी हवा दमट असल्याने नागरिकांचा आता कुलर आणि एसी घेण्याकडे कल आहे. बाजारात इलेक्ट्रिक दुकानांमध्ये कुलर आणि एसींना मागणी वाढली आहे. सर्वसामान्यांना परवडणारे कुलर बाजारात उपलब्ध आहेत, तर श्रीमंत लोकांचा कल एसी घेण्याकडे आहे.
उन्हामुळे वाढले वीजबिल
उन्हामुळे दिवसरात्र फॅन, एसी, कुलर यामुळे नागरिकांच्या वीजबिलातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, भयंकर उकाडा असल्याने वातानुकुलित यंत्रणा सुरू ठेवल्याशिवाय पर्याय नाही. वीजबिल कमी करण्यासाठी नागरिक सायंकाळी बागा, उद्यानांमध्ये वेळ घालविताना दिसत आहेत.