मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात अनेक भागांत उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडत असून, अस्वच्छता वाढत आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी तेथे नियमितपणे साफसफाई तसेच, सुशोभिकरण करत आहेत. प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा दंड करूनही, बेशिस्त नागरिकांकडून शहर अस्वच्छ करण्याची सवय काही जात नसल्याचे चित्र आहे.
इंदूर शहराच्या धर्तीवर शहर कचराकुंडीमुक्त करण्यात आले आहे. शहरातील सर्व कचराकुंड्या हटविण्यात आले आहेत. गल्लोगल्ली घंटागाडी जाऊन घरोघरचा ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबाबत स्वयंसेवक नागरिकांमध्ये जनजागृतीही करत आहेत.
असे असताना काही बेशिस्त नागरिक कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरून मोकळी जागा, रस्त्याकडेला, पदपथ तसेच, नदीपात्र, नाले व गटारीत फेकून देतात. कार, दुचाकीवर येत सुशिक्षित नागरिकही असे प्रकार करत असल्याने स्पष्ट झाले आहे. पकडले जाऊन, दंड होऊ नये म्हणून काही नागरिक रात्रीच्या अंधारात कचरा टाकून पसार होतात. कचरा टाकू नये, असे लिहिलेल्या फलकाखालीच कचरा भरलेल्या पिशव्या फेकला जातात. त्यामुळे मोकाट व भटकी कुत्री तसेच, जनावरे त्यातील खाद्यपदार्थ व खरकट्या अन्न पदार्थावर जगत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व कचरा सर्वत्र पसरून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होते. तसेच, रोगराई पसरण्याचा धोका आहे. बीआरटी मार्गावरील बस थांब्यावरील हँगिंग लिटर बिन्समध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक कचरा टाकला जात असल्याने त्या भरून वाहताना दिसल्याचे चित्र जागोजाची दिसते. कचऱ्याचे ते ढीग आरोग्य विभागाकडून ताबडतोब हटवले जात आहेत. तेथे सुशोभिकरण केले जात आहे. या अस्वच्छतेमुळे महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कचऱ्याचे ढीग निर्माण होणाऱ्या शहरातील ठिकाणाचा शोध घेऊन, तेथे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. वर्षभरात बेशिस्त नागरिकांकडून तब्बल 1 कोटी 15 लाख 88 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दंड करूनही उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. ते प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
वर्षभरात एक कोटी 15 लाख 88 हजारांचा दंड वसूल
उघड्यावर कचरा टाकण्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून कारवाई केली जाते. नागरिकांकडून 100 ते 500 रुपये दंड केला जातो. तसेच, कंपन्या, दुकानदार व व्यावसायिकांना 5 हजार ते 50 हजारांचा दंड केला जातो. एक एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या एका वर्षांच्या कालावधीत एकूण 5 हजार 435 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 15 लाख 88 हजार 300 रुपयांचा दंड जमा झाला आहे.
दंड करण्यासाठी तृतीयपंथीयांचेही पथक नेमणार
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तीव करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकाची संख्या वाढविण्यात येत असून, तृतीयपंथीयांचेही पथक नेमण्यात येणार आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता घंडागाडीतच टाकावा. आपण पिंपरी-चिंचवड शहराची दुसऱ्या शहराशी तुलना करतो. त्याप्रमाणे आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. महापालिकेकडून वारंवार आवाहन करूनही काही नागरिक उघड्यावर कचरा फेकतात. त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.