पिंपरी: निवडणूक आयोगाकडून सध्या (एसआयआर) अर्थात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षणच्या कामात महापालिका शाळांमधील अनेक शिक्षक व्यग्र आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पालिका शाळांत शिक्षकांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणदेखील वाढले आहे.
एसआयआरच्या कामासाठी निम्म्यापेक्षा जास्त शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत ते मतदार नोंदणी, घरोघरी पाहणीच्या कामात शिक्षक व्यस्त आहेत. त्यामुळे वर्गात शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. मानधनावर असणाऱ्या एका शिक्षकाला २-३ वर्ग एकत्र करून अध्यापनाचे काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थी कंटाळून शाळेत येणे टाळत आहेत. गेल्या महिन्यात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ८५ टक्क्यावरून ६० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
एसआयआरचे काम संपेपर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकांच्या शाळांची पटसंख्या वाढावी म्हणून महापालिकतर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. पटसंख्या वाढावी यासाठी गणवेश, पुस्तके, दप्तर, बूट व शालेय साहित्य याबरोबर सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षणही दिले जात आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
अद्यापही शालेय साहित्य वाटप नाही
महापालिका शाळांमध्ये दोन महिने उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलेले नाही. शालेय साहित्य नसल्यामुळेही विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा कल कमी होत आहे. तसेच गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पाऊस जास्त आहे. शाळा सुरु झाल्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करणे गरजेचे होते. पावसामध्ये शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांकडे रेनकोट नाही. त्यामुळे भिजत शाळेत जाण्यापेक्षा पालकच विद्यार्थ्यांना आजारी पडू नये म्हणून शाळेत पाठवित नाही.
प्रशासनाची दप्तर दिरंगाई, विद्यार्थ्यांना फटका
विद्यार्थ्यांना महापालिकेकडून दप्तर, शूज-मोजे, वह्या, व्यावसायिक पुस्तके, कंपासपेटी, रेनकोट, शालेय बूट, वॉटर बॉटल, फुटपट्टी, चित्रकला वही, भुगोलवही, प्रयोगवही आदी वस्तू रूपात साहित्य दिले जाते. मात्र, यंदा डीबीटीव्दारे थेट लाभ न देता ई-रूपी प्रणालीमध्ये सर्व प्रक्रिया अडकल्याने विद्यार्थी अद्याप साहित्यापासून वंचित आहेत. येत्या शनिवारी स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडे बूट, मोजे इत्यादी साहित्याचा अभाव आहे.
शिक्षकांची पदे रिक्त
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर थेट परिणाम झाला आहे. शिक्षक नसल्यामुळे काही वर्गांना सलग दोन - दोन तास रिकामे बसावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवत आहेत. पालकांनीही मुलांना शिकवणारच कोणी नाही, तर शाळेत पाठवून काय फायदा, अशी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ३९६ शिक्षकांची पदे सध्या रिक्त आहेत. बदली आणि निवृत्तीमुळे ही संख्या वाढली आहे. तात्पुरत्या शिक्षकांची भरती प्रक्रियादेखील रखडली आहे.
मुलांना रोज शाळेत पाठवतो; परंतु ते घरी येऊन सांगतात की, आम्हांला शिकवायला शिक्षक नाही. आम्हांला एकत्र दाटीवाटीने एका वर्गात बसवितात. यंदा रेनकोटदेखील वाटप केले नाही. दरवर्षी रेनकोट देतात म्हणून आम्ही खरेदी केली नाही. त्यामुळे पाऊस असला की मुलाला भिजत कसे पाठविणार मग घरीच बसवावे लागते.इंदू सोनवणे (पालक)