लोणावळा: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या रहाटणी फाटा काळेवाडी परिसरातील एका 24 वर्षीय तरुणाचा धरणाच्या जलाशयामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
ऋतिक कैलास साखरे (वय 24) असे या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी फाटा, काळेवाडी परिसरातील सात तरुणांचा एक ग््रुाप आज पवना धरण परिसरामध्ये फिरायला आला होता. पवना धरण परिसरामध्ये फिरत असताना ऋतिक कैलास साखरे हा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खोल पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग््राामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, पोलिस हवालदार नवनाथ चपटे, पवन कराड हे घटनास्थळी दाखल झाले.
लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम ही देखील पवना धरण परिसरात दाखल झाली. या टीममधील आकाश मोरे, आनंद गावडे, कपिल दळवी, योगेश दळवी, गणेश भांगरे, वैष्णवी भांगरे, महेश म्हसणे, सुनील गायकवाड, अनिकेत घरदाळे, सागर दळवी, महादेव भवर, अनिल आंद्रे, निलेश गराडे, पिंटू मानकर, रमेश कुंभार, राजेंद्र बंडगे, कुंदन भोसले, ओमकार कालेकर, श्रीकांत घेऊदे, अनिकेत घारे, गणेश सरस, आदित्य गोणते, कैसर शेख आदींनी या शोध मोहीममध्ये सहभाग घेतला होता.
रेस्क्यू पथक, पोलिस प्रशासन व स्थानिक तरुण यांच्या शोध मोहिमेला यश आले असून, पाच वाजताच्या सुमारास पाण्यामध्ये बुडालेल्या ऋतिक याला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी काले कॉलनी येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.
पर्यटन स्थळांवर येणारे अनेक तरुण-तरुणी हे पाण्यात भिजण्याच्या मोहापोटी धरणांच्या किंवा पाण्याचा साठा असलेल्या जलाशयामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात व धोकादायक पद्धतीने पर्यटन करत आपल्या जीवाला मुकत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. भविष्य काळामध्ये असे प्रकार रोखण्यासाठी पर्यटकांनी देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.