नवलाख उंबरे: उन्हाळ्याच्या दिवसात जोमात सुरू असलेला शीतपेय व्यवसाय अवकाळी पावसामुळे अक्षरशः कोलमडला आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, थंड पेयांची मागणी झपाट्याने घटली आहे. याचवेळी युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेली महागाई आणि इंधन दरांचा परिणाम यामुळे खर्च वाढल्याने विक्रेत्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. परिणामी, लहान व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
एप्रिल महिन्यात साधारणतः ज्यूस, शरबत, आईस्क्रीम यांना मोठी मागणी असते. या काळात अनेक छोटे व्यावसायिक तात्पुरते स्टॉल लावून किंवा गाड्या उभ्या करून चांगला व्यवसाय करतात. मात्र, यंदा अवकाळी पावसाने या सर्व गणितावर पाणी फेरले आहे. सलग पावसामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, बाहेर पडले तरी गरम पेय किंवा खाद्यपदार्थांकडे त्यांचा कल वाढला आहे.
विक्रेते आर्थिक संकटात
अनेक विक्रेत्यांनी कर्ज काढून किंवा उधारीवर माल आणून व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, विक्री घटल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. काही ठिकाणी तर विक्रेत्यांनी स्टॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, परिस्थिती सुधारण्याची ते वाट पाहत आहेत. ग््रााहकांच्या वागणुकीतही बदल दिसून येत आहे. गार हवामानामुळे थंड पेयांऐवजी चहा, कॉफी किंवा गरम नाश्त्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच, वाढत्या महागाईमुळे ग््रााहकही खर्चाबाबत सावध झाले आहेत. त्यामुळे बाहेर खाण्यापिण्यावर मर्यादा येत आहेत.
एकूणच, अवकाळी पावसाचा फटका आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेली महागाई या दुहेरी संकटामुळे थंड पेय विक्रेत्यांचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. हवामान स्थिर होऊन उन्हाची तीवता वाढेपर्यंत तरी या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असून, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी होत आहे.
लिंबांची मागणी घटली
फेब्रुवारीपासूनच परिसरात उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी थंड पेयांची मागणी वाढली होती. त्यामुळे लस्सीसोबतच ताक, उसाचा रस, लिंबूपाणी यांनाही मागणी वाढली होती. तरीही पारंपरिक चव आणि पौष्टिकता यामुळे लस्सीला सर्वांधिक पसंती मिळत होती, परंतु मागील तीन-ते चार दिवस झालेल्या पावसामुळे थंड पेयांना मागणी कमी झाली आहे. तसेच, लिंबांचीही मागणी घटली आहे.
विक्रेत्यांचे नुकसान
स्थानिक विक्रेत्यांसाठीही हा हंगाम फायदेशीर ठरत होता. उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्राहकांची संख्या दुपटीने वाढली होती. विशेषतः दुपारी सर्वांधिक गर्दी असायची, परंतु अवकाळी पावसामुळे गर्दी पूर्णपणे कमी झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे नुसान होत आहे.
उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे आमच्यासाठी कमाईचा काळ असतो; पण यावर्षी पावसामुळे सर्वच बिघडले. त्यातच महागाईमुळे कच्चा माल आणि इंधन खर्च वाढल्याने नफा शून्यावर आला आहे.समाधान शिंदे, विक्रेते