मोशी: येथील सेक्टर क्रमांक १७ मधील जॉगर्स पार्क परिसरात असलेल्या महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मैलायुक्त व अशुद्ध पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे लगतच्या घरकुल परिसराला याचा मोठा फटका बसला आहे.
एसटीपी प्रकल्पाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने या भागातील घरांमध्ये १०-१० फुटांपर्यंत पाणी साचत असून, नागरिकांचे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतीच पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली, ज्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येत्या आठ दिवसांत आयुक्तांसोबत विशेष बैठक घेऊन, स्पाईन रोडवरून नवीन पाईपलाईन टाकून हे पाणी घरकुल परिसराबाहेरून वळवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, गेल्या १० वर्षांपासून घरकुलवासीयांसह स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचेही यामुळे मोठे नुकसान होत असून, त्यांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि जुन्या नकाशांच्या आधारे परिसराचे सर्वेक्षण व अभ्यास करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास सध्याच्या यंत्रणेवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे आता वरच्या भागातील पाणी थेट घरकुलमध्ये येऊ न देता, ते स्पाइन रोडवरून पुढे वाहून नेण्याचे नियोजन आहे. अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा योग्य गतीने होण्यासाठी हा नवीन ओपन नाला अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे भविष्यात घरकुल परिसरातील पाणी साचण्याची समस्या पूर्णपणे सुटेल.अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, मनपा.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी घरकुलमधील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या समस्येचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माझी नुकतीच फ प्रभागातील अधिकाऱ्यांसह बैठक झाली असून, आयुक्तांसोबत ८ दिवसांत बैठक ठरवून स्पाईन रोडने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम तातडीने मंजूर करून घेतले जाईल. तसेच, ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांना भरपाई द्यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.नीलेश नेवाळे, नगरसेवक
गेल्या १० वर्षांपासून घरकुल प्रकल्पाच्या बाजूला असणाऱ्या घरांचे व शेतीचे एसटीपी प्लांटच्या ओव्हरफ्लो पाण्यामुळे नुकसान होत आहे. प्रशासनाला आता आम्ही आणखी वेळ देणार नाही. घरकुलवासीय आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल.कुंदन गायकवाड, नगरसेवक