मोशी : मोशी कचरा डेपोतून येणाऱ्या रसायनमिश्रित आणि दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, विहिरी आणि पवित्र इंद्रायणी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर रवी लांडगे आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना लेखी निवेदन दिले आहे.
मोशी येथील बोराटे वस्ती परिसरात असलेल्या कचरा डेपोतून मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी खालच्या बाजूला असलेल्या ओढ्या-नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे. हे विषारी पाणी परिसरातील शेतजमिनी आणि विहिरींमध्ये उतरत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दूषित पाणी प्यायल्यामुळे गाई, म्हशी आणि शेळ्या मृत्युमुखी पडत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हेच पाणी पुढे जाऊन मोशी येथे इंद्रायणी नदीला मिळत असल्याने नदीचे पावित्र्य नष्ट होत असून,
वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीविताला आणि आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विषयाचा पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. कचरा डेपोतून येणारे हे सांडपाणी बंद पाईपलाईनद्वारे योग्य ठिकाणी सोडावे, जेणेकरून प्रदूषण थांबेल, अशी आग््राही मागणी त्यांनी केली आहे.
कचरा डेपोतील रसायनमिश्रित पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. जनावरे दगावत आहेत. हेच पाणी इंद्रायणी नदीत मिसळून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आम्ही अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य आणि पवित्र नदीचे रक्षण करावे, अन्यथा तीव आंदोलन छेडावे लागेल.संतोष बोराटे, नागरिक