उर्से मावळ: यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी ‘जलतारा’ योजना भूजल पातळी वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेंतर्गत शेतांमध्ये 5 बाय 6 फूट आकाराचे जलसंचय खड्डे खोदून पावसाचे पाणी जमिनीत मुरवले जाते. त्यामुळे भूजलसाठ्याचे पुनर्भरण होण्यास मदत मिळते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ग््राामसभेत लेबर बजेट मंजूर झाल्यानंतर तालुकास्तरावरून योजनेस मान्यता दिली जाते. त्यानंतर तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरवात करता येते. ‘एल निनो’ या हवामान बदलाच्या परिणामामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत तसेच मावळ तालुक्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असून, पाणीसाठा वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग््राामपंचायतीकडे अर्ज सादर करणे, 7/12 उतारा जोडणे, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड आवश्यक आहे तसेच कृषी सहायक किंवा ग््राामसेवकांकडून जागेची पाहणी केली जाते. योजनेंतर्गत खड्डा खोदकामासाठी शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
मजुरीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. गेल्या काही वर्षांतील अपुरा पाऊस, वाढता पाण्याचा उपसा आणि कमी पुनर्भरण यामुळे मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूजल पातळी घटली आहे. काही ठिकाणी विहिरींची पाणीपातळीही चिंताजनकरीत्या खाली गेली आहे. त्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाया जाण्याची भीती आहे. त्यासाठी जलतारा गरजेचे आहे.
भूजलपातळी वाढविण्याचा उद्देश
प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. गावोगावी नाले खोलीकरण, शेततळे, बंधारे दुरुस्ती आणि जलसाठा वाढविण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूजलपातळी वाढविण्यावर भर देण्यात येत असून, नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले आहे. जलसंधारणाच्या या उपाययोजनांमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.