पिंपरी: नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय प्रवेशासाठी जात, उत्पन्न, अधिवास प्रमाणपत्र किंवा इतर महत्त्वाच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांना सरकारी कार्यालये किंवा आपले सरकार सेवा केंद्रात हेलपाटे माराचे लागतात. मात्र, आता पालकांची ही वणवण थांबणार आहे. शाळेतच विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शालेय प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्र, मागील शाळेचा हस्तांतरण दाखला (टीसी), आधार कार्ड (विद्यार्थी आणि पालक), रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि लागू असल्यास जात किंवा उत्पन्न प्रमाणपत्र या मुख्य कागदपत्रांची आवश्यकता असते. ही कागदपत्रे वेळेत न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब होतो तसेच शैक्षणिक नुकसान देखील होते. त्यामुळे आता ही दाखले वेळेत मिळण्याची सुविधा शाळांमध्येच केली जाणार आहे.
आपले सरकार सेवा केंद्राचे' प्रतिनिधी थेट शाळांमध्ये येऊन दाखल्यांसाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासन, शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने शाळांमध्ये शिबिरांचे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दाखल्यांसाठी सरकारी कार्यालये आणि महा ई सेवा केंद्रांच्या चकरा मारण्याची वेळ येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व विलंब टळण्यास मदत होणार आहे.
पैसे वाचणार आणि एंजटगिरीला चाप
सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रामधून आधार कार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्र काढावी लागतात. शिवाय तेथे एजंटशिवाय कामे जलद होत नाहीत. एजंट मंडळी पालकांकडून जादा पैसे उकळतात, अशी पालकांसह विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मात्र, आता शाळेतच दाखले देण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने एजंटगिरीला चाप बसण्याबरोबरच विद्यार्थी आणि पालकांचे पैसही वाचणार आहेत.
शाळेतच विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाकडून आले आहेत. त्यानुसार आम्ही शाळांना तशा सुचना केल्या आहेत.जयराज देशमुख ( अप्पर तहसिलदार )