लोणावळा: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला गड येथील आगरी-कोळी समाजाची कुलस्वामिनी व कुलदैवत असलेल्या आई श्री एकवीरा देवीचा पालखी सोहळा बुधवारी (दि. 25 मार्च) होणार आहे. चैत्री यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर टोलमाफी मिळणार आहे.
चैत्री यात्रेनिमित्त येणाऱ्या मानाच्या पालख्यांचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक लोणावळा ग््राामीण पोलिस ठाण्यात पार पडली. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पोलिस निरीक्षक विजया मेहेत्रे, श्री एकवीरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र खुणे, गोपनीय अधिकारी नितीन कदम, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सागर देवकर, सहसचिव महेंद्र देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, निवेदक विवेक पोरजी, गणेश अवास्कर, देवीचंद कोळी, अशोक कोळी, अमरेश ठाणेकर, कुणाल कोळी, विशाल डवले, रुपेश म्हात्रे तसेच चौल, पेण, पनवेल, ठाणे व मुंबई येथील पालखी प्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पुणे-मुंबइ राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर टोलमाफी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
यात्रेतील प्रमुख कार्यक्रम
चैत्री यात्रा कालावधीत 24 मार्च रोजी श्री कालभैरवनाथ देवाची पालखी सोहळा (देवघर), 25 मार्च रोजी श्री आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा (वेहेरगाव, कार्ला गड), 26 मार्च रोजी देवीचा तेलवान / मानपान कार्यक्रम, 2 एप्रिल रोजी श्री ढाक कालभैरव, श्री कालभैरवनाथ देवघर व श्री भैरवनाथ वेहेरगाव काठी पालखी सोहळा होणार आहे.
हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता
या यात्रेला महाराष्ट्रातील आगरी, कोळी, भंडारी, सी.के.पी., कराडी, कुणबी आदी समाजातील हजारो भाविक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई तसेच कोकण किनारपट्टी भागातून मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. समुद्र किनाऱ्यावरील गावांमधून येणारे भाविक घाटमाथा चढून कार्ला गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यात्रेनिमित्त सर्व पालखी प्रमुखांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे श्री एकवीरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र खुणे यांनी गेली 25 वर्षे देवीच्या सेवेसाठी निस्वार्थ योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश तायडे व एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
यात्रेनिमित्त पायथा ते एकवीरा गडापर्यंत विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दर्शनाच्या वेळी किंवा रांगेत असताना देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी व स्वयंसेवकांशी वाद घालू नये, हुल्लडबाजी करू नये व इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व पालखी प्रमुखांनीही या नियमांचे स्वागत करत यात्रेला शांततेत, शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारली.
विकासकामांना गती
श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पायथा ते गडापर्यंत भक्तांच्या सोयीसाठी पायऱ्या, गटारे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, दर्शन रांग व्यवस्था, पालख्यांसाठी विशेष दर्शन सुविधा तसेच गडावरील कठड्यांचे बांधकाम आदी विकासकामे सुरू असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली. यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करणारे जयेंद्र खुणे यांनी शासनस्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री तसेच आयआरबी आणि एमएसआरडीसी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
गडावर फटाके फोडण्यास बंदी
यात्रा कालावधीत कार्ला गडावर पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी गडावर फटाके व शोभेची दारू वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व पालखी मंडळांनी आपापल्या पालख्या दुपारी 1 वाजण्यापूर्वी गडावर आणणे आवश्यक राहणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व पालखी मंडळांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर स्वच्छता राखावी, कचरा टाकू नये. तसेच, कोणताही वाद-तंटा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.