लोणावळा: शहरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा जोर मागील दोन दिवसांपासून काहीसा कमी झाला आहे. त्यामुळेच लोणावळा शहरातील पुराचा धोका तूर्तास टळला आहे.
लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे वलवण धरण 90 टक्क्यांहून अधिक भरले आहे. टाटा कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबतची लेखी माहिती देत शहरामध्ये स्वयंचलित दरवाजाद्वारे पाणी सोडण्याचा इशारा दिला होता.
ज्या भागामध्ये पाण्याचा विळखा बसू शकतो, अशा भागांमध्ये पी. एस. सिस्टीमद्वारे सूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत कळवण्यात आले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्रातून पाणी सोडले जाणार होते. मात्र, निसर्गाने साथ दिली व पावसाने आपला जोर कमी केला. यामुळे शहरामध्ये निर्माण झालेली दुसरी पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच थांबली आहे.
दोन दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग
टाटा कंपनीचे वलवण धरण आहे. या धरणामधून शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढून 90 टक्क्यांच्या पुढे गेली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास व डोंगर भागांमधून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास धरण 100 टक्के भरून ओव्हर फ्लो होऊ शकतो.
याकरिता धरणातून काही प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची तयारी टाटा कंपनीने केली होती. याबाबत नागरिकांना आगाऊ सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाला व शहरावर आलेले दुसरे पुराचे मोठे संकट दूर झाले. पावसाचा जोर कमी झाला असला तरी टाटा कंपनीने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्या दिवशी शंभर क्युसेक वेगाने व दुसऱ्या दिवशी 90 क्युसेक एक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे.
पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची मागणी
पावसाचे दोन महिने संपले असले तरी अजून दोन महिने पाऊस शिल्लक आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कधीही पाऊस पडत आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये जुलै महिन्यासारखा पाऊस पडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ती नियंत्रण ठेवण्यासाठी धरणामधून पाणी काही प्रमाणामध्ये सोडले जात आहे.
या पाण्यामुळे पुराचा कोणताही धोका नसून, पावसाचा वेग वाढल्यास हा धोका उद्भवू शकतो. याकरिता प्रशासनाने हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेत योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.