लोणावळा: शहरामध्ये पाच व सहा जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्यवर्ती भागातील हुडको कॉलनी व आजूबाजूच्या इतर रहिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरामधील किमान एक हजाराहून अधिक कुटुंबांना या पुराचा फटका बसला आहे. तरीही नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी आमच्याकडे फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी (दि. १०) लोणावळा नगर परिषदेवर मोर्चा काढला.
अनेक घरांचे पहिले मजले पाण्याखाली गेले होते. तर, बैठी घरे पूर्णपणे पाण्याखाली होती. नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. अशा परिस्थितीमध्ये नगर परिषदेकडून आम्हाला कोणतीही योग्य मदत प्राप्त झाली नाही, असा आरोप मोर्चादरम्यान नागरिकांनी केला. अनेकांनी फोटो, व्हिडीओ काढले व व्हायरल केले. तरीही नागरिकांना मदत मिळाली नाही. नगर परिषदेकडून पावसाळापूर्व कामांमध्ये नदीपात्रातील जलपर्णी काढणे, नालेसफाई करणे ही कामे यावर्षी योग्य प्रकारे न झाल्यामुळे शहरामध्ये पुराची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अतिक्रमणे काढत नैसर्गिक प्रवाह मोकळे करा
इंद्रायणी नदी तसेच या नदीला मिळणारे अनेक मोठे ओढे व नाले अतिक्रमण झाल्यामुळे लहान झाले आहेत. नगर परिषदेने ही अतिक्रमणे काढत पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरामध्ये झालेली पूरपरिस्थिती व त्यामधून झालेले नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान याला नगर परिषद व टाटा कंपनी जबाबदार असून, त्यांनी नागरिकांच्या नुकसानेची ही भरपाई करून द्यावी, अशी मागणीदेखील या आंदोलनादरम्यान नागरिकांनी केली आहे. नागरिकांचा नगर परिषदेच्याविरोधामध्ये असलेला प्रचंड संताप व आक्रोश या आंदोलनामधून पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक वादावादीदेखील झाली. आमदार सुनील शेळके हे नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या व नगरपरिषद, टाटा कंपनी यांच्या माध्यमातून प्रत्येकाला योग्य मदत दिले जाईल, असे आश्वासन पूरग्रस्तांना दिले. मागील तीन ते चार दिवसांपासून पूरग्रस्त नागरिकांना लोणावळा नगर परिषदेच्या तळमजल्यावर जेवण बनवून देण्याची व्यवस्था केली जात आहे. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून अन्नधान्याची कीट बनवण्यात आले असून, बाधित कुटुंबांना ते सर्व साहित्य पुरवले जाणार आहे.
अतिक्रमणांवर कारवाई करा : प्रांताधिकारी नवले
लोणावळा नगर परिषद हद्दीमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला निसर्गाप्रमाणेच येथील अतिक्रमणे कारणीभूत आहेत. नदीपात्राच्या ब्ल्यू लाईन व रेड लाईनमध्ये येणाऱ्या या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा. ज्या बांधकामांना नगर परिषदेकडून परवानगी देण्यात आलेली नाही, अशी बांधकामे पाडण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी लोणावळा नगर परिषदेला दिल्या आहेत.
नागरिकांच्या घरांचे ताबडतोब पंचनामे करा
पुराच्या पाण्यामुळे ज्या-ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहेत, त्या प्रत्येकाचे पुढील दोन दिवसांमध्ये पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी तयार करून द्या. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी व सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत.
प्रशासनाच्याविरोधात आंदोलनकर्त्यांचा संताप
लोणावळा शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होत असताना प्रशासन काय करत होते, पावसाळापूर्व जी कामे करायला हवी होती ती प्रशासनाने योग्य प्रकारे केली नाही, नागरिकांच्या घरांना पुराचा विळखा बसला असताना प्रशासन कोठे होते, जलपर्णी योग्य प्रकारे का काढली गेली नाही, टाटा धरणामधून शहरामध्ये पाणी येत असताना त्याबाबतच्या पूर्वकल्पना नागरिकांना का दिल्या गेल्या नाहीत, अशा विविध प्रश्नांची सरबती करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्याविरोधातला आपला संताप आंदोलनादरम्यान व्यक्त केला.