हिंजवडी लवकरच महापालिका हद्दीत; माण, मारुंजी, नेरे, जांभे, सांगवडेसह गहुंजेचाही समावेश File Photo
पिंपरी चिंचवड

PCMC Expansion: हिंजवडी लवकरच महापालिका हद्दीत; माण, मारुंजी, नेरे, जांभे, सांगवडेसह गहुंजेचाही समावेश

कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री घेणार बैठक

पुढारी वृत्तसेवा

Hinjawadi to be Included in Municipal Limits

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्कसह हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांभे, सांगवडे व गहुंजे या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, कार्यवाहीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित गावांचा महापालिका हद्दीत समावेश होईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हिंजवडी आयटी पार्कची समस्यांच्या विळख्यातून मुक्तता व्हावी, यासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक बोलावली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या दूर करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीस उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमवेत आयटी फोरम, सोसायटी फेडरेशनसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.  (Latest Pimpri News)

आयटी पार्कमधील समस्यांवर तोडगा

हिंजवडी आयटी पार्कमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडी, पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आणि वीजसमस्यांमुळे आयटी पार्कमधील आयटीयन्स आणि विविध कंपन्यांचे अधिकारी हैराण झाले आहेत. त्यामुळे आयटीयन्स आणि सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून अनलॉग हिंजवडी असे स्वाक्षरी अभियान राबवले होते.

या अभियानाला सुमारे 30 हजार आयटीयन्सनी पाठिंबा दिला. या समस्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एमआयडीसी, जिल्हा परिषद, पीएमआरडीए, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा सर्व विभागांच्या अधिकार्‍यांसह आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींची सविस्तर आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड येथील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार, गुरुवारी ( दि. 10) मुंबईत मंत्रिमंडळ सभागृहात बैठक होत आहे.

कोणती आहेत ही गावे?

हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी), सांगवडे व गहुंजे (ता. मावळ) या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी 2018 सालीच महापालिकेने ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

मागणी मागील प्रमुख कारणे

  • राजीव गांधी आयटी पार्कमुळे या परिसरात आयटी व औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत.

  • मोठ्या प्रमाणावर आयटीयन्स व बाहेरील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत.

  • या सात गावांची एकत्रित लोकसंख्या अंदाजे 2 लाखांवर पोहोचली आहे.

  • रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, वाहतूक यंत्रणा यावर ताण वाढला आहे.

  • विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे रखडली आहेत.

समावेश झाल्यास होणारे फायदे :

  • एकसंध नागरी प्रशासनाखाली नियोजनबद्ध व शाश्वत विकास

  • समन्वित व जलद निर्णयक्षम व्यवस्था

  • वाहतूक समस्यांवर ठोस उपाय

  • आवश्यक नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

  • उद्योग व आयटी क्षेत्राला भरपूर सहकार्य

  • शासनाच्या महसुलीत वाढ

या भागातील गावांची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. बांधकामावर नियंत्रण ठेवूशकत नाही. त्यामुळे या परिसराला बकालपणा येत आहे. वाहतूककोंडी, विविध समस्यांमुळे या भागातील नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ.
हिंजवडी आयटी पार्कची समस्यांच्या विळख्यातून मुक्तता व्हावी. यासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतंत्र बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात समाविष्ट भागाचा विकास गतिमान होईल, यात शंका नाही.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT