नवलाख उंबरे: यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात झालेली तीव्र वाढ ही दूध व्यवसायासाठी गंभीर आव्हान ठरत आहे. कडक उन्हामुळे गाई-म्हशींच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून, त्यांच्या दुधाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. उष्माघात, पाण्याची कमतरता आणि वाढत्या उकाड्यामुळे जनावरे कमी दूध देत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे.
15 ते 20 टक्के उत्पादनात घट
तापमानवाढीचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही तर, जनावरांच्या एकूण कार्यक्षमतेवरही होत आहे. दिवसभराच्या उष्णतेमुळे जनावरे कमी खातात, अधिक वेळ निष्क्रिय राहतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर दिसून येत आहे. अनेक दूध उत्पादकांनी गेल्या काही आठवड्यांत 15 ते 20 टक्के उत्पादनात मोठी घट झाल्याचे सांगितले आहे.
ग्रामीण भागात दूध व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने या परिस्थितीचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, वाढते तापमान आणि त्याचा जनावरांवर होणारा विपरीत परिणाम यामुळे दूध व्यावसायिक हैराण झाले असून, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक ठरत आहेत.
जनावरांना शक्य तितका हिरवा चारा द्यावा. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कॅल्शियमसाठी आवश्यक औषधे उपलब्ध आहेत. तसेच, बायपास फॅटचा पशुखाद्यात समावेश केल्यास दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. उन्हाळ्यात जनावरांना थंड वातावरण मिळावे यासाठी शेड, पंखे किंवा पाण्याची फवारणी यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.-डॉ. गणेश मुळीक, पशुवैद्य, सुदुंबरे
जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्या शेतकरीबांधवांकडे पाण्याची सोय आहे, अशांनी शाळु, मका, बाजरी यासारखी जनावरांना दुधासाठी उपयुक्त अशा पिकांची लागवड करावी.- मारुती साळे, कृषी अधिकारी, मावळ
चाऱ्याचा खर्चात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे जनावरांचे दूधही कमी झाले आहे. त्यामुळे आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.- मनोहर घोजगे, दूध व्यावसायिक