कॅटरर्सवाले अडचणीत
हॉटेल, मिठाई दुकाने पडू लागली बंद
खिशात पैसे पण खायला मिळेना, विद्यार्थ्यांची अवस्था
पिंपरी : आखाती युद्धामुळे देशभरात गॅस टंचाईचे संकट आले आहे. जीवनावश्यक वस्तू असलेल्या गॅसचा तुटवडा असल्याने सर्वच स्तरावर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे शहरातील अनेकांनी घरातील लग्नकार्य पुढे ढकलली आहेत. तसेच, हॉटेल आणि केटरर्सचालकांनीदेखील बुक केलेल्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत.
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरची गरज असते; मग ते कुटुंब असो, हॉटेल किंवा चहा-वडापावची टपरी, नाष्टा सेंटर असो. प्रत्येक छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांच्या सर्वच गोष्टी गॅस सिलिंडरवर अवलंबून असतात. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद केल्यामुळे हॉटेल आणि केटरर्स व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्यामध्ये जवळपास 500 ते 2000 जणांच्या जेवणाच्या ऑडर्स मिळतात. हॉटेल आणि केटरर्स व्यावसायिकांबरोबर यातून महिलांना रोजगार मिळत असतो. महिलांना चपाती, पुरी लाटण्याचे, भांडी घासण्याचे काम तर तरुण मुलांना जेवणावळीत वाढपी म्हणून रोजगार मिळत असतो. गॅस सिलिंडर टंचाईमुळे जेवणाच्या ऑडर्सचे ॲडव्हान्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, जेवणासाठी लागणारी साधने पुरविणारे भांडीवाले, भाजीवाले, मांडववाले यांचेही नुकसान होत आहे.
व्यावसायिक गॅसपुरवठा बंद झाल्याने शहरातील मिठाई दुकानदारांनी किचन बंद ठेवली आहेत. फक्त तयार पदार्थच विकले जात आहे. मिठाईच्या दुकानामध्ये समोसा, कचोरी, ढोकळा, जिलेबी आदी नाष्ट्याचे पदार्थ मिळतात. तर, फरसाणसाठी शेव, मठरी, शंकरपाळे, बाकरवडी, गुलाबजाम, बुंदी, पापडी अशा तळणीच्या पदार्थांना दररोज गॅस सिलिंडर लागतो. सध्या हे पदार्थ करण्याचे काम थांबले आहे. तसेच, फरसाण, शेव, खारीबुंदी आदी पदार्थ मिळत नसल्यामुळे भेळ व पाणीपुरी विक्रेत्यांनादेखील टंचाईचा सामाना करावा लागत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील छोट्या वडापावच्या टपऱ्या आणि नाष्टा सेंटरदेखील बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. शहरामध्ये परप्रांतीय आणि परजिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेले बहुतांश विद्यार्थी आहेत. दररोज मेसचे जेवण आणि दिवसभरात भूक लागल्यास चहा, वडापावसाठी विद्यार्थ्यांची टपरीवर गर्दी असते. तसेच, कामगार आणि कष्टकरीवर्गदेखील अल्पोपहारासाठी वडापाववर अवलंबून असतात. टपऱ्या व नाष्टा सेंटर बंद असल्याने भूक लागली तर विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे.
शहरातील टपऱ्या आणि नाष्टा सेंटर बंद असल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची निराशा होत आहे. खिशात पैसे आहेत, पण भूक भागविण्यासाठी दुकानातील चिवडा, वेफर्स, बिस्किट अशा पॅकेट फुडचा आधार घ्यावा लागत आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे वडापाव आणि चहाची दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत.
आम्ही केटरर्सच्या सर्व ऑर्डर रद्द केल्या आहेत. गॅस सिलिंडर मिळाला तर आम्हाला काम सुरू करता येणार आहे. त्यामुळे लग्नकार्यदेखील पुढे ढकलली आहेत. आमचे किचन आठ दिवसांपासून बंद आहे. सध्या जो तयार माल आहे तोच आम्ही विकतो.प्रसन्न भन्साळी, नयन स्वीट ॲण्ड केटरर्स
गेल्या दोन दिवसांपासून वडापाव व नाष्टा सेंटर बंद ठेवले आहे. गॅसपुरवठा कधी सुरळीत होईल, याची माहिती नाही. त्यामुळेे दुकान बंद ठेवले आहे.राहुल बोरकर, शिवसमर्थ वडेवाले