

संतोष शिंदे
पिंपरी : शहरातील काही पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची (ठाणे इंचार्ज) प्रत्यक्ष भेट मिळणे कठीण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तक्रारींचे समाधान न झाल्याने काही नागरिकांनी थेट पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या कार्यालयात धाव घेतल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या असून, तक्रारदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहज भेट मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दररोज विविध प्रकारच्या तक्रारींसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. चोरी, फसवणूक, आर्थिक व्यवहारांतील वाद, कौटुंबिक तक्रारी तसेच स्थानिक पातळीवरील विविध वादांबाबत नागरिक पोलिसांकडे दाद मागण्यासाठी येतात. प्राथमिक स्तरावर तक्रारींची माहिती कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची भावना तक्रारदारांमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही तक्रारदारांनी थेट वरिष्ठ कार्यालयाकडे धाव घेतल्याचे दिसून येते.
‘दैनिक पुढारी’ने पोलिस आयुक्तालयात आलेल्या काही तक्रारदारांशी संवाद साधला असता, काही प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यात गेलेल्या नागरिकांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी प्रत्यक्ष भेट झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे आमची तक्रार नेमकी काय आहे, त्यावर कोणती कार्यवाही झाली आहे किंवा प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही, अशीही तक्रार काही नागरिकांनी व्यक्त केली. काही पोलिस ठाण्यांमध्ये दुपारच्या वेळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट मिळणे कठीण होत असल्याचीही तक्रारदारांची भावना आहे. गंभीर किंवा संवेदनशील प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद आवश्यक असतो. मात्र, योग्य वेळी भेट न झाल्यास तक्रारदारांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे कामाचे स्वरूप लक्षात घेतल्यास त्यांना अनेकदा रात्री उशिरापर्यंत तपास, बंदोबस्त, गस्त किंवा प्रशासकीय कामांमुळे ड्युटी करावी लागते. सकाळी लवकर कामकाज सुरू होत असल्याने काही वेळ विश्रांतीची गरज भासणे स्वाभाविक मानले जाते. मात्र, या काळात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यास कनिष्ठ अधिकाऱ्यांनीही तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना ठाणे अंमलदार कक्षाच्या दर्शनी भागात ‘तक्रारदारांचे समाधान न झाल्यास त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची भेट घ्यावी’ असा फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या फलकावर संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा मोबाईल क्रमांक नमूद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहज भेट मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त तसेच सहायक पोलिस आयुक्त यांनी पोलिस ठाण्यांच्या भेटीदरम्यान या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच सूचनांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची तक्रार गांभीर्याने ऐकून घेणे आणि त्याचे समाधान करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. तक्रारदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहज भेट मिळावी यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारदारांचे समाधान न झाल्यास त्यांनी थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधता यावा, यासाठी दर्शनी भागात माहिती फलक लावण्याबाबत निर्देश दिले आहेत.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यावर अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट मिळत नाही. कनिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे आवश्यक असते. त्यामुळे तक्रारदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहज भेट मिळाली तर अनेक तक्रारी ठाणे स्तरावरच सुटू शकतात.
तक्रारदार, पिंपरी-चिंचवड