देहूगाव: देहू ते देहूरोड या राज्य मार्ग क्रमांक ११६ वरील सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास देहूरोड येथील देहूफाटा कमानीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देहूगाव, झेंडेमळा, चिंचोली, किन्हई व काळोखे मळा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
देहू ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असून, येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम, यात्रा व उत्सवांचे आयोजन होत असते. विशेषतः पालखी सोहळ्याच्या काळात लाखो वारकरी भाविक देहूत दाखल होत असल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. सध्या देहू ते देहूरोड दरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद असून, वारंवार अपघात घडत आहेत. पायी दिंड्या, पालखी सोहळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
रस्त्याच्या हद्दीचा वाद
या मार्गाचा काही भाग विविध प्रशासकीय विभागांच्या अखत्यारीत असल्याने संबंधित विभागांकडून 'हा रस्ता आमच्या अखत्यारीत नाही' अशी टोलवाटोलवी केली जात असल्याने काम रखडले आहे. यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा केला असला तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. देहूनगर पंचायत हद्दीतील रस्ते तसेच देहू-देहूरोड दरम्यानचा पाच किलोमीटरचा मार्ग 'अ' वर्गात समाविष्ट करून वाढती वाहतूक लक्षात घेता रुंदीकरणाची कामे तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वारकऱ्यांना करावा लागतोय कोंडीचा सामना
देहू ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असून, येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, यात्रा व उत्सवांचे आयोजन होत असते. विशेषतः पालखी सोहळ्याच्या काळात लाखो वारकरी भाविक देहूत दाखल होत असल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वारकऱ्र्यांना तसेच स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. संबंधित प्रशासनांनी एकत्र बसून येथील हद्दीचा वाद मिटवून नागरिकांची गैरसोय दूर करावी.
अपघातांचे प्रमाण वाढले
सध्या देहू ते देहूरोडदरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. वाढती लोकसंख्या, तीर्थक्षेत्राला येणाऱ्र्या नागरिकांची वाढती गर्दी आणि दळणवळणांची साधने वाढल्याने हा रस्ता कमी पडत आहे. हद्दीच्या वादामुळे आहे तो रस्तादेखील खड्डे, गतिरोधक आदींना खराब झाला आहे. साईडपट्ट्या खराब झाल्या आहेत. यामुळे येथून प्रवास करणाऱ्र्या नागरिकांना व वाहनचालकांना अपघात घडत आहेत. पायी दिंड्या, पालखी सोहळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
देहू ते देहूरोड हा रस्ता तीर्थक्षेत्र देहू व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पालखी सोहळ्याच्या काळात वारकऱ्यांना पायी चालण्यासाठीदेखील हा रस्ता कमी पडतो. या रस्त्याचे डांबरीकरण व इतर कामेदेखील लवकर केली जात नाहीत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह वारकरी त्रस्त आहेत. तरी संबंधित प्रशासनाने यावर योग्य निर्णय घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे.स्थानिक ग्रामस्थ