पिंपरी: चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाची जादू निर्माण करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने हिंदी व मराठी चित्रपट, संगीतविश्वावर आणि त्यांच्या लाखो चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय संगीत, गझलपासून ते कॅबरे आणि पॉपपर्यंत विविध संगीत प्रकारातील अजरामर गाण्यांमुळे त्या रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. संगीत क्षेत्रातील या असंख्य अविस्मरणीय गाण्यातून त्या नेहमीच आपल्या बरोबर राहतील, अशा या सूरसमाज्ञीबद्दल शहरातील गायक, मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना...
आशाताई आणि लतादीदी या भारतीय सांगीतिक प्रवासातील लतादीदी या श्वास होत्या, तर आशाताई उच्छ्वास होत्या. त्यामुळे अशा व्यक्ती अनंतात विलीन होतात हेच मान्य नसतं. कारण वयाचे मूल्यमापन कधी होत नाही. त्यामुळे स्वररूपाने त्या आपल्यातच आहेत. शरीररूपाने झालेला हा मोठा धक्का आहे. पण आशाताई खूपच दिलखुलास, गाण्याप्रमाणेच त्यांचं मनही, ओसंडून वाहत असलेले व्यक्तिमत्त्व, तरुणाईला देखील लाजवेल असा त्यांचा उत्साह. त्यांच्या बरोबरमाझा गेल्या 23 वर्षांचा स्नेह आहे. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं; तसेच पिंपरी-चिंचवड शहरावर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची परवानगीही त्यांनी या प्रेमापोटीच दिली होती, ही शहरासाठी खूप अभिमानाची बाब आहे.भाऊसाहेब भोईर (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिं.चि.)
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चतुरस्त्र गायिका म्हणून नावलौकिक मिळविलेल्या आशाजींच्या निधनाने मनाला अतीव दुःख झाले. एका अल्बमच्या निमित्ताने मला मुंबईतील त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांचे वय ऐंशीच्या पुढे होते. त्या वयातही त्यांचा उत्साह, गाण्यांबद्दलची ओढ थक्क करणारी होती. तत्पूर्वी 1997-98च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर त्यांची माझी भेट झाली होती. माझा मुलगा पिनाक माझ्यासोबत होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी खूप मोठा हो, असा आशीर्वाद दिला होता. हा प्रसंग म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं’भारती न्यायाधीश (गायिका)
आशा भोसले यांचं जाणं म्हणजे भारतीय संगीत विश्वासाठी एक युग संपल्यासारखं आहे. आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या आवाजातील भाव, प्रयोगशीलता आणि विविधतेचं जिवंत उदाहरण होत्या. शास्त्रीय, गझल, भजन, पॉप, कॅब्रे प्रत्येक प्रकारात त्यांनी आपल्या आवाजाने वेगळी छाप उमटवली. हजारो गाण्यांतून त्यांनी पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनात घर केलं. आज संगीतविश्वाने केवळ एक महान कलाकार गमावलेली नाही, तर एक प्रेरणास्थान, एक दिशा आणि एक अविस्मरणीय स्वर हरवला आहे. आशाताई, तुमचा आवाज कायम आमच्यासोबत राहील आणि आमच्या प्रत्येक सुरात तुमची छाया असेल.सन्मिता शिंदे (गायिका, विजेत्या सूर नवा ध्यास नवा)
आशा भोसले या आमच्या गायक कलाकारांचे दैवत आहेत. एखाद्या गायकाने किती विविध शैलींची गाणी गावीत हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. आयुष्यात अनेक प्रसंग येऊन देखील गाण्यावर प्रेम आणि जिद्दीने संगीत क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. नेहमी केसात फूल, हातात माईक, पांढरी साडी आणि चेहऱ्यावर हसू, असे गोड अन् प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहायची आम्हाला सवय झाली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील दिव्य रत्न हरवले आहेशर्मिला शिंदे (गायिका)
आशाजी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. माझ्यासाठी लताजी अन् आशाजी देवस्वरूप आहेत. लताजी हा आत्मा आणि आशाजी या संगीत विश्वाचे शरीर होत्या. रोज आशाजींचे स्मरण केल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही.नंदिन सरीन (गायक)
आशा भोसले यांचा वारसा अमूल्य आहे. सात दशकांहून अधिक काळ चाललेली कारकीर्द, हजारो गाणी आणि असंख्य पुरस्कारांसह, त्यांनी एक असा संगीतमय खजिना मागे ठेवला आहे. त्यांच्या निधनाने एका संगीत युगाचा अंत झाला आहे; परंतु त्यांचा आवाज लाखो रसिकांच्या हृदयात कायम जिवंत राहील. एकदा कर्जतमधील एन. डी. स्टुडिओमध्ये माझ्या गाण्याचे शूटिंग सुरु असताना एक कार्यक्रमानिमित्त आशाजींचे मला तिथे दर्शन झाले होते. गाणे ऐकून मी मोठा झालो.अक्षय लोणकर (गायक / संगीतकार)