पिंपरी: जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहून गुरुवारी (दि.९) पुणे शहराकडे मार्गस्थ झाला. मात्र, या परिसरातील पालखी तळाची जागा अपुरी पडते. त्यामुळे सोहळा प्रमुखांसह विश्वस्त व अन्य प्रमुख दिंड्यांतील वारकर्यांच्या मुक्कामाची गैरसोय होते. ती दूर करण्यासाठी आकुर्डी येथील खंडोबा माळ येथील 22 गुंठे जागेत वारकरी भवन उभारावे, अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून केली जात आहे. महापालिकेने वारकरी भवन उभारणीसाठी सन 2006 मध्ये ठराव केला होता. अद्याप वारकरी भवन कागदावरच आहे.
संत तुकाराम महाराज यांचे देहू आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी स्थळ आळंदी ही तीर्थक्षेत्रे आकुर्डीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. वर्षभर विविध कार्यक्रमांनिमित्त वारकर्यांची आकुर्डीतून ये-जासुद्धा सुरू असते. आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा देहूनंतरचा पहिला मुक्काम पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीत असतो.
येथील पालखी तळाची जागा अपुरी पडत असल्याने वारकर्यांची मोठी गैरसोय होते. वारकर्यांना हक्काचे निवारा केंद्र मिळावे, म्हणून वारकरी संप्रदायाकडून सातत्याने वारकरी भवन उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, वारकर्यांच्या मागणीला अद्याप यश आले नसून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी वारकर्यांच्या मुक्कामाचा प्रश्न ऐरणीवर येतो. वारकरी भवन उभारण्याबाबत कार्यवाही होत नसल्याचे वारकर्यांमध्ये महापालिकेच्या कारभाराविषयी चीड निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आकुर्डीत वारकरी भवन उभारण्याबाबत डिसेंबर 2006 मध्ये ठराव मंजूर केला होता. त्यासाठीची जागाही निश्चित करून 66 लाख 98 हजार रुपयांचा निधीही मंजूर केला. मागील 20 वर्षात काहीच झाले नाही. सन 2024 मध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित जागेची पाहणी करून वारकरी भवन उभारले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी 2024-25 च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात वारकरी भवन उभारण्याच्या कामाचा समावेश केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा वारकरी भवन उभारण्याबाबत पुढेच काहीच झाले नाही. त्यामुळे वारकरी भवन तातडीने उभारावे, अशी मागणी वारकर्यांमधून सातत्याने केली जात आहे. यंदाच्या वारीतही त्याचा मुहूर्त लागलेला नाही.
महापालिकेने वारकरी भवन लवकरात लवकर उभारावे
जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा देहूनंतरचा पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असतो. वाढते शहरीकरण व नागरीकरणामुळे पालखी सोहळ्यातील दिंड्या, वारकरी, फडकरी यांना निवासाची समस्या भेडसावत आहे. वारकरी भवन उभारल्यास वारकर्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रशस्त व सुंदर वारकरी भवन उभारून वारकर्यांना आगळीवेगळी भेट द्यावी, असे देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले.
आर्किटेक्टची नियुक्ती
आकुर्डी येथील खंडोबा माळ येथील 22 गुंठे जागेत वारकरी भवन उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी आर्किटेक्ट नियुक्त करण्यात आला आहे. भवनच्या बांधकामासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.