Akurdi Traffic Signal Failure Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Traffic Signal Failure Congestion: आकुर्डीतील संत ज्ञानेश्वर चौकात सिग्नल बंद; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

स्वयंचलित यंत्रणा ठप्प, पर्यायी व्यवस्था नाही; अपघाताचा धोका वाढल्याने वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

आकर्डी: पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग कार्यालयाजवळील संत ज्ञानेश्वर चौकामध्ये स्वयंचलित वाहतूक नियंत्रण करणारी सिग्नल यंत्रणा बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच वाहनचालकांना विस्कळीत वाहतुकीचा सामना करावा लागत आहे.

संत ज्ञानेश्वर चौकातील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे यावरती कोणतीही पर्याय व्यवस्था वाहतूक नियंत्रण अधिकारी यांनी केली नसल्यामुळे या चौकात विस्कळीत व वाहतूक कोंडीबरोबरच वाहनचालकांना जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे. संत ज्ञानेश्वर चौकातील सिग्नल व्यवस्था सातत्याने बंद पडत असल्याने स्थानिकांमध्ये वाहतूक नियंत्रण अधिकारी यांच्याविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे.

संत ज्ञानेश्वर चौक हा आकुर्डी, निगडी, चिंचवड या भागांना जोडणारा मध्यवर्ती ठिकाण आहे. या चौकात दिवसभर सातत्याने चारही बाजूने वाहनांची वर्दळ असते. जवळच अ क्षेत्रीय कार्यालय, लोकमान्य हॉस्पिटल, भक्ती-शक्तीकडे जाणारा रस्ता, तसेच म्हाळसाकांत विद्यालय, सीएमएस विद्यालय, सरस्वती विद्यालय, गुरुगणेश विद्यालय असे अनेक शाळा, महाविद्यालये असून, या चौकातून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची व पालकांची ये-जा सुरू असते.

सायंकाळी विविध कंपन्यांच्या बसेस कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी या चौकातून जाताना दिसतात. त्याचबरोबर खासगी वाहने, बस, रिक्षा दुचाकी यांची वर्दळ असते. या चौकातील वाहतूक सिग्नल व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडतात. स्वयंचलित वाहतूक यंत्रणा बंद पडल्यानंतर महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडून वाहनचालकांची कुठलीही दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना संधी मिळत आहे.

या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे वाहनांची कोंडी झाली होती. मात्र, याच परिस्थितीमुळे एखादी दुर्घटना घडू शकते. यासाठी वेळीच उपाययोजना करून वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाने कार्यवाही करून स्वयंचलित वाहतूक यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

चौकात वाहतूक पोलिस नियुक्त करा

बंद सिग्नल यंत्रणा, लाईटची वाजलेले तीनतेरा, दूषित पाणीप्रश्न, रस्त्यांची दुरवस्था अशा विविध कारणाने व वेळोवेळी निर्माण होणाऱ्या या समस्यांमुळे शहरातील नागरिक हैराण आहेत. यावर योग्य तो पर्याय काढून लवकरात लवकर निगडी, आकुर्डी, चिंचवड या भागातील सिग्नल व्यवस्था सुरळीत करावी. तसेच सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिस नियुक्त करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT