आकुर्डी: सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या तापमानात मोठी वाढ होऊ लागली आहे. उकाडा व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फॅन, कुलर, एसी आदी कुलिंग साहित्य घरोघरी सुरू आहेत; परंतु वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त आहेत. आकुर्डी, निगडी, चिंचवड परिसरातील वीजपुरवठा सुरळित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवसेंदिवस तापमानात झपाट्याने होणारा बदल, सध्या सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा, दुपारी उन्हाने होणारी शरीराची काहीली या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे निगडी, चिंचवड, आकुर्डी या परिसरामधील महावितरणकडून केला जाणारा विद्युत पुरवठा विविध कारणाने खंडित केला जातो. यामुळे महावितरणकडून सर्वसामान्य ग््रााहकांची गैरसोय केली जात आहे. या संदर्भात महावितरणविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सध्या सर्वत्र सीबीएससी व स्टेट बोर्डच्या वार्षिक परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. यातच रात्री व दिवसभरामध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता काम चालू आहे, थोड्या वेळात विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, अशी उत्तरे देऊन ग््रााहकांची बोळवण केली जाते. मात्र, त्यानंतरही तासनतास हा वीजपुरवठा पूर्ववत होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या वीजप्रवाहामुळे विद्यार्थी, गृहिणी, दुकानदार व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
व्यावसायिकांचे नुकसान
सध्या उन्हाळा सुरू आहे. शीतपेय तसेच दूध, दही, ताक आदींना मागणी वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत; परंतु सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्ध व्यवसाय, शीतपेयांचा विक्री करणारांची मोठी गोची होत आहे. अनेकदा दुग्धजन्य पदार्थ उष्णतेने खराब होत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकदा कमी क्षमतेने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत उपकरणे जळत आहेत. यामुळे मोठे नुकसान होत आहे. यामुळे महावितरणने पूर्ण क्षमतेने आणि कायमस्वरुपी वीजपुरवठा करणे गरजेचे आहे.
ग््रााहकांची गळचेपी
सातत्याने वर्षभरापासून मागणी करूनही अद्यापपर्यंत या मागणीची महावितरणकडून दखल घेतली गेली नाही. केबल बदलवणार, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणार, नवीन केबल टाकून देणार, ग््रााहकांच्या सर्व तक्रारीचे निवारण केले जाणार, अशा प्रकारची आश्वासने देऊन ग््रााहकांची फसवणूक केली जाते. वेळोवेळी याच प्रकारची उत्तरे महावितरण कार्यालयातून निवेदन दिल्यानंतर मिळतात. याबाबत तक्रार कोण सोडविणार?
आकुर्डी, निगडी, चिंचवड हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीजप्रवाह खंडित होत असल्याने घरात लहान मुलांची व ज्येष्ठ नागरिकांचे उष्णतेने हाल होत आहेत. यापूर्वी स्थानिक नेत्यांनी महावितरण कार्यालयात आंदोलने करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदने दिलेत. परंतु, महावितरण अभियंत्यांकडून याबाबत कुठलीही दखल घेतली गेली नाही. ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत तक्रार कुणाकडे करावी आणि हा प्रश्न कोण सोडविणार, असा सवाल उपस्थित होत आहे.अनंत चौधरी, सेवानिवृत्त