आकुर्डी: ओलसर कचरा, अडगळीच्या वस्तू यामुळे दत्तवाडी, आकुर्डी, विठ्ठलवाडी, निगडी प्राधिकरणात ठीकठिकाणच्या कचऱ्याच्या ढिगार्यांमुळे, वाढलेल्या गवतामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली आहे. त्यामुळे रात्रंदिवस नागरिकांना या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक वेळा थंडी ताप, मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया यासारख्या आजारांमुळे मुले, महिला व नागरिक त्रस्त आहेत. शहरातील कचरा समस्या गंभीर बनल्याने परिसरात कचऱ्याचे साम्रज्य पसरले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या स्वच्छ व सुंदर शहराचा बोजवारा उडाला. परिसरात अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने कचरा संकलन व स्थलांतरण झाल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे त्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. या परिस्थितीमध्ये शहरभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा ओला झाल्यामुळे वेळेवर न उचलला गेल्याने दुर्गंधी व डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्य विभागाकडून जंतुनाशक फवारणीकडे काणाडोळा
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनामार्फत कचऱ्याचे व्यवस्थापन होणे आवश्यक असतानाही. त्याची योग्य दखल न घेतल्याने ओल्या कचऱ्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली असून, परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. यातच पावसापूर्वी व आता जंतुनाशक फवारणी करणे आवश्यक असतानाही योग्य त्या पद्धतीने परिसरामध्ये फवारणी व धुराळणी होत नाही, याबाबत आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाने तात्काळ कार्यवाही करून भेडसावणारा आरोग्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.
आमच्या इमारतीच्या आजूबाजूला कचरा साचला असून, त्यामुळे दुर्गंधी बरोबरच डासांचाही त्रास सहन करावा लागतो. प्रशासन व स्थानिक प्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित येथील कचरा साफ करावा.शांभावी काळे, स्थानिक.
कचऱ्यामुळे दुर्गंधीचा सामना करत श्वास घ्यावा लागतो. अन्नपदार्थाची भेसळीमुळे आरोग्याची वाट लागते, आणखी किती समस्यांना सामोरे जायचे? प्रत्येक गोष्टीचा कर भरूनही आमची ही स्थिती, प्रशासनाने फक्त प्रत्येक विभागाचे निविदा काढायच्या, ठेकेदार गलेलठ्ठ बनवायचे, सामान्य नागरिकांना मात्र त्रास होईल असेच वागायचे का? प्रशासनाने आकुर्डी, निगडीतील कचरा समस्या त्वरित सोडवावी.निवृत्त सनदी अधिकारी