आकुर्डी: मुंबई-पुणे महामार्गावरील बजाज ऑटो आकुर्डी गेटसमोरील भुयारी मार्ग रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अधिकाऱ्यांकडून केवळ पाहणीचा दिखावा केला जात असल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या भुयारी मार्गाची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. येथून जाताना दुहेरी वाहतूक असतानाही अडथळ्याची शर्यत पार करावी लागते.
पुणे- मुंबई महामार्गावरती निगडी, आकुर्डी खंडोबा माळ, भाजी मंडई, पोस्ट ऑफिस चिंचवड या ठिकाणांना जोडणारा भुयारी मार्ग आहे; परंतु या सात ते दहा मीटर लांब असणाऱ्या भुयारी मार्गाची पावसाळ्यामध्ये खड्डेमय अवस्था झाली आहे.
अनेक महिन्यांपासून या ठिकाणी पुणे महामेट्रोची कामे सुरू आहेत. सततच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे येथे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावे लागतात. अनेक वेळा या मार्गावर अपघातही घडले असून, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.
या भुयारी मार्गाची पाहणीचा शून्य दिखावा करण्यात आला. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न करता दोन-पाच खड्डे बुजवून बोळवण करण्यात आली. महापालिका प्रशासनाने चालक व नागरिकांचे हित लक्षात घेऊन या भुयारी मार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आकुर्डी, निगडी व चिंचवड या मार्गांना जोडणारा बजाज ऑटो कंपनी समोरील भुयारी मार्ग हा दुवा आहे. या भुयारी मार्गातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सलग दोन वर्षांपासून सुरू असलेल्या महा मेट्रोच्या कामामुळे तसेच निगडी ते दापोडी बंदिस्त जलवाहिनीमुळे रस्त्याचे व भुयारी मार्गाचे तीन तेरा वाजले असून, बऱ्याच वर्षांपासून भुयारी मार्गाचे डांबरीकरण रखडले आहे. या भुयारी मार्गाची उंची कमी असल्यामुळे डांबरीकरण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी पेव्हिंग ब्लॉक अथवा इतर रस्त्याप्रमाणे काँक्रिटीकरण करावे व कायमचा प्रश्न मार्गी लावावा.लक्ष्मीकांत कांबळे, ज्येष्ठ नागरिक