भारती पवार  
Latest

शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह अवकळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकासह गहू, हरभरा या रब्बी पिकांचे तसेच द्राक्षबागा व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र देऊन केली असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरभरा व इतर रब्बी पिके भुईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन दिवसांत बाधित झालेले १९१ गावे व संभाव्य बाधित होणाऱ्‍या गावांमध्ये अंदाजे २६०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असल्याने कष्टकरी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे, असेही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT