पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात आश्रय घेतलेल्या अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या हद्दपारीचा आदेश पाकिस्तान सरकारने दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी बुधवार, १ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. हजारो अफगाण नागरिक ट्रक आणि इतर वाहनांमधून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर गर्दी करत असून, त्यांना सक्तीने हद्दपार केले जात असल्याचे वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Pakistan repatriating Afghans) दरम्यान, मानवाधिकार संघटनांनीही या कारवाईची गंभीर दखल घेतली आहे.
पाकिस्तानमधील कराचीत सोहराब गोठ भागाजवळ पाकिस्तानातील सर्वात मोठ्या अफगाण नागरिकांची वस्ती आहे. येथून आता मोठ्या प्रमाणावर अफगाण नागरिक बसने अफगाण सीमेकडे रवाना होत आहेत. आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये सुमारे ४०लाख विदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामध्ये बहुतांश अफगाण नागरिक आहेत. १९८० मध्ये अफगाणिस्तानवर रशियाने हल्ला केला. तेव्हा युद्धग्रस्त देश सोडून या अफगाणिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये पलायन केले होते. तसेच २०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा एकदा तालिबान्यांनी काबीज केली. यानंतरही लाखो अफगाण नागरिक पाकिस्तानात स्थलांतर झाले होते. ( Pakistan repatriating Afghans ) गेली चार दशकांहून अधिक काळ पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिक पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या वाटेवर आहेत.
पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या सर्व स्थलांतरित नागरिकांना स्वेच्छेने देश सोडवा. अन्यथा त्यांना हद्दपारीला सामोरे जावे लागले, असा आदेश पाकिस्तान गृह मंत्रायलयाने ३ ऑक्टोबर रोजी काढला होता. सर्व स्थलांतरित नागरिकांना १ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता, असे काळजीवाहू गृहमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले. सर्व बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या स्थलांतरितांविरुद्ध हे पाऊल उचलले जात आहे, असा पाकिस्तान सरकार दावा करत असले तरी हा आदेश केवळ अफगाणिस्तानातून स्थलांतरित झालेल्यांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचे मानले जात आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारबराेबर पाकिस्तानचे संबंध बिघडलेले आहे. अशातच पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत आहे. देशात २० लाखांहून अधिक अफगाण नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याचा अंदाज आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या संख्येमुळे ही कारवाई केली जात असल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे. पाकिस्तानमध्ये यावर्षी जानेवारीपासून तब्बल २४ आत्मघाती हल्ले झाले आहेत. या २४ आत्मघाती हल्ल्यांपैकी १४ अफगाण नागरिकांनी केले होते, असा दावा काळजीवाहू गृहमंत्री सरफराज बुगती यांनी केला आहे. त्यामुळै अफगाणिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश पाकिस्तानी सरकारने दिले आहेत.
केवळ दहशतवादी हल्ल्यांमुळेच पाकिस्तानने हा निर्णय घेतलेला नाही असे नाही. तर देशआर्थिक दृष्ट्या रसातळाला गेला आहे. महागाई 31.4 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या परिस्थितीत अफगाणी नागरिक आपला रोजगार हिरावत असल्याचे पाकिस्तानच्या नागरिकांचे म्हणणे आहे.सुमारे २० लाख अफगाण नागरिकांना हद्दपार केल्यामुळे देशातील बेरोजगारी कमी होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असाही दावा केला जात आहे.
पाकिस्तानच्या आदेशाचे मानवाधिकार संघटनांनी दखल घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील नागरिकांवर पाकिस्तान सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसेच नागरिकत्वचा पुरावा नसलेल्या अफगाण कामगारांना कामावरून काढून टाकत जात आहे. पाकिस्तान पोलीस अशा नागरिकांना अटक करत आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर नागरिकांचा पूर आला आहे. दररोज सुमारे चार हजारांहून अधिक नागरिक मायदेशी परतत आहेत.
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या कारवाईचा अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने निषेध केला आहे. ही कारवाई 'अस्वीकार्य' असल्याचे तालिबान सरकारने म्हटले आहे. या निर्णयावर पाकिस्तान सरकारने पुनर्विचार करावा, अशी विनंती तालिबानी सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी केली होती. मात्र पाकिस्तानने ही विनंती धुडकावत ही कारवाई सुरुच ठेवली आहे.
संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (United Nations High Commissioner for Refugees) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. या समितीनेही या कारवाईवर आपेक्ष घेतला आहे. तसेच ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनेही पाकिस्ताने हा निर्णय मागे घ्यावा. स्थलांतरित आणि आश्रय शोधणार्यांची सक्तीने हद्दपार करणे थांबवावे, अशी मागणी केली हाेती. अफगाणिस्तानातून पलायन केलेले नागरिक आश्रय आणि संरक्षणाची मागणी करत आहेत. यापैकी बहुतेक आश्रय शोधणारे माजी सरकारी कर्मचारी, कार्यकर्ते, पत्रकार किंवा इतर आहेत. ज्यांना अफगाणिस्तानात तालिबानकडून धमक्या, छळ आणि अटकेचा सामना करावा लागतो," असेही संघटनेने म्हटले होते.
मानवाधिकार संघटनांनी या कारवाईवर आक्षेप घेतल्यानंतरही पाकिस्तानने आपले अफगाण नागरिकांच्या हद्दपारीचे धोरण सुरुच ठेवणार आहे. देशात अनेक हद्दपारी केंद्रे स्थापन केली आहेत. या माध्यमातून आता पाकिस्तानात वास्तव्यास असलेली अफगाण नागरिकांना ताब्यात घेण्यात येणार आहे. स्थलांतरीत नागरिकांचा शोध घेवून त्यांना अटक केली जाईल, असा इशारा पाकिस्तान गृह मंत्रायलाने दिला आहे. अवैधरित्या पाकिस्तान वास्तव्यास असणार्या अफगाणच्या नागरिकांची हकालपट्टी टप्प्याटप्प्याने केली जाईल पहिल्या टप्प्यात प्रवासी कागदपत्रे नसलेल्या लोकांना हद्दपार केले जाणार असल्याचेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :