पुढारी ऑनलाईन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. याची माहिती गृह मंत्रालयने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. या दिवशी सर्व इमारतींवर फडकत असलेला राष्ट्रीय ध्वज हा अर्ध्यावर फडकवला जाईल. या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नसल्याचे, ट्विटरवर शेअर केलेल्या पत्रात भारतीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
गुरूवारी रात्री (८ सप्टेंबर) ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. बकिंगहॅम पॅलेस येथून मिळालेल्या माहितीनूसार स्कॉटलँड येथे बाल्मोरल कॅसल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात आले. त्यानंतर भारत सरकारनेही त्यांच्या सन्मानार्थ एकदिवसीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला.