Himanta Biswa Sarma vs Gaurav Gogoi
आसाममधील कोळसा गैरव्यवहारावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता वैयक्तिक आरोपांपर्यंत गेला असून, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यात ट्विटरवर थेट संघर्ष सुरु झाला आहे. ईडीच्या छाप्यांनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकारणात खळबळ उडवली आहे.
खासदार गौरव गोगोई यांनी आसाममधील कथित बेकायदेशीर कोळसा उत्खनन प्रकरणावरून मुख्यमंत्री सरमा यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सांगितले की, "ईडीने आसाममधील बेकायदेशीर कोळसा साम्राज्य उघड केले आहे.
1.58 कोटी रुपयांची रोकड जप्त झाली आहे. दररोज 1200 टन कोळसा बेकायदेशीररित्या उत्खनन केला जातो. सरकारच्या संरक्षणाशिवाय ही लूट शक्य आहे का? 'सिंडिकेट राजा' कोण?" असा सवालही त्यांनी केला होता.
मुख्यमंत्री सरमा यांनी या आरोपांना उत्तर देताना गोगोई यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारले की, "राहुल गांधी आणि त्यांची टीम सातत्याने ईडीला राजकीय हत्यार असल्याचे सांगत बदनाम करत आहे.
तर दुसऱ्या बाजूला त्यांचे नेते ईडीचा उदोउदो करतात. या दुटप्पी मतांतून काँग्रेसचा संभ्रम आणि ढोंगीपणा समोर आला आहे.
तुम्ही सलग 15 दिवस पाकिस्तानात का गेला होता? "तुमच्या पत्नीला भारतात राहत असूनही पाकिस्तानातील NGO कडून पगार मिळतो का? तुमच्या पत्नी आणि मुलांकडे कुठल्या देशाचे नागरिकत्व आहे? ते भारतीय आहेत का? 10 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही पुरावे समोर आणू."
माझा मुलगा किंवा मुलगी कधी पाकिस्तानला गेलेली नाही. तसेच माझी पत्नी कधीही पाकिस्तानकडून पगार घेणार नाही. माझ्या घरातील सर्वजण भारतीय आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
गौरव गोगोई यांनी या आरोपांना उत्तर देताना ट्विटरवर लिहिले की, "जर माझी पत्नी ISI एजंट असेल, तर मी RAW एजंट आहे! तुमच्या पत्नी आणि मुलांबद्दल प्रश्न विचारायला तयार आहात का? कोळसा माफियांशी संबंध असलेल्या लोकांवर पोलिस कारवाई करणार का? तुमचे आरोप जर खोटे ठरले तर राजीनामा द्याल का?"
हिमंत सरमा यांनी आपल्या पोस्टमध्ये माजी मुख्यमंत्री आणि गौरव गोगोई यांचे वडील तरुण गोगोई यांचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, "स्व. तरुण गोगोई यांचे नातवंड भारतीय नागरिक नाहीत, हे त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक ठरेल."
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सरमा यांनी ठाम भूमिका घेतली आहे की, "जे कोणी पाकिस्तानला थेट किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतील, त्यांच्यावर आसाम सरकार कठोर कारवाई करेल.
दरम्यान, या वादाचे पडसाद आसामच्या आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे. निवडणूकपूर्व वातावरण तयार करण्यासाठीच ही रणनीती वापरली जात असल्याची चर्चा आहे.