Xi Jinping India visit Pudhari
राष्ट्रीय

Xi Jinping India visit : शी जिनपिंग नवी दिल्लीत दाखल, सात वर्षांनंतर PM मोदींबरोबरील भेट का आहे महत्त्वपूर्ण?

दोन्ही देशांमधील सीमावाद, द्विपक्षीय संबंधांमधील सुधारणा आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चेचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

Xi Jinping India visit : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सात वर्षांनंतर भारताच्या भूमीवर दाखल झाले आहेत. नवी दिल्लीत पार पडणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील सीमावाद, द्विपक्षीय संबंधांमधील सुधारणा आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी-शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडेल. पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरूनच जिनपिंग भारतात आले आहेत. चिनी राष्ट्राध्यक्षांचा हा सात वर्षांनंतरचा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये चेन्नईजवळील महाबलीपुरम (मामल्लापुरम) येथे झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी ते भारतात आले होते. चिनी राष्ट्राध्यक्षांसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले आहे. यामध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीसी) पोलित ब्युरो स्थायी समितीचे सदस्य आणि मध्यवर्ती समितीच्या जनरल ऑफिसचे संचालक काई ची तसेच परराष्ट्र मंत्री आणि पोलित ब्युरो सदस्य वांग यी यांचा समावेश आहे.

दोन्ही नेत्यांच्या बैठकीपूर्वी चीनची भूमिका

पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्या या बैठकीबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी बीजिंगमध्ये माहिती दिली. कझान आणि त्यांजिन येथील बैठकांनंतर दोन्ही नेते समोरासमोर येण्याची ही सलग तिसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. चीन दोन्ही सर्वोच्च नेत्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनानुसार काम करण्यास, द्विपक्षीय संबंधांकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्यास, संवाद वाढवण्यास, सहकार्य मजबूत करण्यास आणि परस्पर मतभेद योग्य प्रकारे सोडवण्यासाठी भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिनपिंग परिषदेला करणार संबोधित

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी ब्रिक्स परिषदेला उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या एकतेचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हटले. जिनपिंग या परिषदेला संबोधित करतील आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती तसेच ब्रिक्सच्या विकासावर चर्चा करतील. रशिया-युक्रेन युद्ध आणि इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या परिषदेबाबत त्या म्हणाल्या की, चीन संवादाच्या माध्यमातून वादांवर राजकीय तोडगा काढण्याचा आणि जागतिक शांततेचा पुरस्कर्ता आहे.

संबंध पूर्ववत करण्याचे प्रयत्न

२०२० मध्ये पूर्व लडाखमधील सीमेवर निर्माण झालेल्या लष्करी तणावानंतर दोन्ही देशांमधील संबंध दीर्घकाळ थंडावले होते. अशा परिस्थितीत जिनपिंग यांचा भारत दौरा संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यापूर्वी गेल्या महिन्यात २५ ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात विशेष प्रतिनिधी स्तरावरील २५ व्या फेरीची चर्चा झाली होती. त्या बैठकीत सीमा व्यवस्थापन आणि सीमांकनावर वेगाने पुढे जाण्याबाबत महत्त्वाचे संमती करार झाले होते.

विमानसेवा पूर्ववत करून संबंधांना गती देण्याचा प्रयत्न

शी जिनपिंग भारतात पोहोचण्यापूर्वीच 'चायना सदर्न एअरलाइन्स'ने शनिवारी (दि. ११ सप्‍टेंबर) एक मोठी घोषणा केली. एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरपासून ग्वांगझू-नवी दिल्ली मार्गावर नियमित प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली ही सेवा दोन्ही देशांमधील हवाई संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर एअरलाइन दक्षिण आशियातील आपल्या आठ राउंड-ट्रिप मार्गांवर दरमहा आणि दरआठवड्याला १०० हून अधिक उड्डाणे करेल. यामुळे भारत आणि चीनदरम्यान व्यापार, पर्यटन आणि प्रवाशांच्या दळणवळणाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT