vande mataram mandatory west bengal
कोलकाता: पश्चिम बंगालमधील शुभेंदु सरकारने राज्यातील सर्व मदरशांमध्ये 'वंदे मातरम' गाणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या निर्णयावर एजेयूपी (AJUP) चे अध्यक्ष आणि प. बंगालमध्ये बाबरी मशिदीच्या धर्तीवर मशीद बांधण्याची घोषणा करणारे हुमायूं कबीर यांनी आव्हान दिले आहे. मदरशांमध्ये वंदे मातरम गायले जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मदरशांच्या अंतर्गत बाबींमध्ये अशा प्रकारचे आदेश देण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगाल मदरसा शिक्षण संचालनालयाने राज्यभरातील सर्व सरकारी, अनुदानित आणि मान्यताप्राप्त मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या प्रार्थना सभेत 'वंदे मातरम'चे गायन तात्काळ प्रभावाने अनिवार्य केले आहे. मदरसा संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, आता सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गाणे बंधनकारक असेल. हा आदेश राज्य सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या संस्थांना लागू राहील.
गेल्या आठवड्यात बंगालच्या शुभेंदु सरकारने शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान 'वंदे मातरम'ची सर्व सहा कडवी गाणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थ्यांना रोजचे वर्ग सुरू होण्यापूर्वी या राष्ट्रीय गीताचे गायन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी आधी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, "पूर्वीचा निर्देश रद्द करत, पश्चिम बंगाल सरकारने शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांसाठी वर्ग सुरू होण्यापूर्वी शाळेच्या सभेत किंवा सकाळच्या प्रार्थनेत भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' गाणे तात्काळ प्रभावाने अनिवार्य केले आहे."
दुसरीकडे, या प्रकरणी कोलकाता खिलाफत कमिटीचे प्रमुख मोहम्मद अशरफ अली कासमी म्हणाले, "मी आधीही सांगितले होते की, सरकारने कोणत्याही धर्माच्या आधारावर काम करू नये. नागरिकांचा विकास सुनिश्चित करणे आणि आपल्याला रोजगार देणे हे सरकारचे काम आहे. आम्ही असे म्हणत नाही की 'वंदे मातरम' गायले जाऊ नये, परंतु ते मुस्लिमांवर लादणे चुकीचे आहे; कारण या गीतातील काही ओळी आमच्या धर्माच्या विरोधात आहेत.. आम्ही पश्चिम बंगाल सरकारला हा निर्णय मागे घेण्याची विनंती करतो."