West Bengal Political Violence: पश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद अन् मारामारी ही आता सामान्य गोष्ट होऊ लागली आहे. राजकीयदृष्ट्या सर्वात हिंसक राज्य म्हणून पश्चिम बंगालचा पहिला नंबर लागतो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांचे खून पाडले जात आहेत. नुकतेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार शुभेंदू अधिकारी यांच्या पीएला भर रस्त्यात गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेनंतर बंगालमधील आतापर्यंत झालेल्या राजकीय हत्याकांडांची फिल्मच नागरिकांच्या डोळ्यासमोर सुरू झाली.
त्यातीलच एक भयानक हत्याकांड हे सेनबाडी घटना म्हणून परिचित आहे. जमाव घरात दाखल होतो. आईसमोर तिच्या दोन मुलांना मारलं जातं. या मुलांचा एवढाच गुन्हा होता की ते एका वेगळ्या विचारधारेचे समर्थन करत होते. या मारेकऱ्यांची क्रूरता इथपर्यंतच थांबली नाही तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेला तिच्या पोटच्या गोळ्यांच्या रक्ताने माखलेला भात देखील खायला भाग पाडण्यात आलं. १७ मार्च १९७० रोजी झालेलं हे हत्याकांड राज्यातच नाही तर देशात सेनबाडी घटना म्हणून परिचित आहे.
ज्येष्ठ पत्रकार अत्रि मित्र यांचा एक लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिला गेला होता. या लेखात या घटनेचा उल्लेख आला आहे. हा लेख २०२१ मध्ये प्रकाशित झाला होता. १७ मार्च १९७० मध्ये दिन बर्धमान शहरातील प्रतापेश्वर शिबतला लेनमध्ये सेनबाडी नावाचे एख ठिकाण होते.
तो दिवस आनंदाचा ठरणार होता. त्या कुटुंबात एका नवजात मुलाचे बारसे होणार होते. यासाठीच्या कार्यक्रमासाठी अनेक नातेवाईक देखील आले होते. मात्र एक दिवस आधी राज्यात युनायटेड फ्रंटचे सरकार पडलं होतं. या सरकारमधील एक सदस्य पक्ष सीपीएमने संप पुकारला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अत्रि मित्र लिहितात की, '१७ मार्चला सीपीएमची एक मोठा रॅली शिबतला आळीत दाखल झाली. त्यानंतर काही आंदोलक सेन कुटुंबियांच्या घरात जबरदस्तीने घुसले. हा सेन परिवार हा काँग्रेसचा समर्थक मानला जात होता. घराला आग लावण्यात आली. त्यानंतर सेन कुटुंबातील प्रणब आणि मलय यांच्यासोबतच कुटुंबाचा एक खासगी शिक्षक जितेंद्रनाथ राय याची या हल्लेखोरांनी हत्या केली. दोन्ही भावांना मारल्यानंतर हल्लेखोरांनी कथितरित्या त्यांची आई मृगनयनी देवी यांना त्यांच्या मुलांच्या रक्ताने माखलेला भात खायला घातला.
एवढंच नाही तर ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात उपस्थित असलेला मृनगयनी यांचा मोठा मुलगा नाबा सेन याची एका वर्षानंतर हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचे डोळे देखील काढण्यात आले होते.
या हत्याकांडाचे साक्षीदार स्वर्णलता दश यांनी २०१३ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, हत्या आणि हल्ला केल्यानंतर सीपीएम सर्थकांनी घरापासून प्रदर्शन फेरी देखील काढली होती. त्यावेळी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये निरूपम सेन आणि बिनॉय कोनार यासारख्या काही वरिष्ठ सीपीएम नेत्यांसह ८३ लोकांची नावे होती. माध्यमातील वृत्तानुसार न्यायालयाने १९७८ मध्ये या ८३ आरोपींना सोडून दिलं होतं.
कुटुंबातील सदस्य रेखाराणी सेन यांनी २०१६ मध्ये इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, माझ्या सासूबाई मृगनयीन देवी यांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आला. दोन हल्लेखोरांनी प्रणब आणि मलय यांचे रक्त भातामध्ये मिसळले आणि ते जबरदस्तीने मृगनयनी यांच्या तोंडात घातले. त्यांना यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या वाचल्या.'
मित्र यांच्या लेखानुसार त्यावेळी सीपीएमने सांगितलं की सेन बंधू हे गुन्हेगार होते. लेखातील उल्लेखानुसार सीपीएमचे म्हणणे होते की ज्यावेळी रॅली शिबतला गल्लीतून जात होती त्यावेळी दुसऱ्या पक्षाने सेनबाडीच्या आतून हल्ला केला होता.