UGC NET 2026 Re-Exam Rahul Gandhi Pudhari
राष्ट्रीय

UGC NET 2026: UGC-NETचा पेपर रद्द, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका; ‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे...’

UGC NET 2026: UGC-NET जून 2026 मधील इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याच्या NTAच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Rahul Shelke

UGC NET 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) UGC-NET जून 2026 परीक्षेतील तीन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या विषयांच्या परीक्षा रद्द करून सप्टेंबरमध्ये पुन्हा घेण्यात येणार आहेत. या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत NTA आणि केंद्र सरकारला या प्रकरणासाठी जबाबदार धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 22 ते 30 जूनदरम्यान इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्राच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, जवळपास दोन महिन्यांनंतर या तीनही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘चूक NTAची, शिक्षा विद्यार्थ्यांना’

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अनेक महिने मेहनत घेतली. त्यांनी अर्ज भरले, परीक्षा शुल्क दिले आणि अनेक जण दूरच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचले. आता त्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी सप्टेंबरमध्ये तयारी करावी लागणार आहे.

त्यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, चूक NTAची आहे; मात्र त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का मिळत आहे? राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या वेळेचे, पैशांचे आणि मानसिक तणावाचेही नुकसान होत असल्याचा आरोप केला.

‘पेपर आधीच लीक झाले होते का?’

राहुल गांधी यांनी NTAच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केला. त्यांनी या परीक्षेतील प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्या होत्या का, असा सवाल केला आहे. त्यांच्या मते, NTAने या प्रकरणातील मुख्य प्रश्नांची अद्याप स्पष्ट उत्तरे दिलेली नाहीत. परीक्षा व्यवस्थेत वारंवार गोंधळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे या दिशेने पहिले पाऊल होते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर NTAच्या वरिष्ठ नेतृत्वाचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘विद्यार्थ्यांची चूक नाही’

सप्टेंबरमध्ये पुन्हा UGC-NET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांनी धीर दिला. या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसल्याचे त्यांनी म्हटले.

परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांची वर्षे आणि मेहनत वाया जात असल्याचा आरोप करत, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आपण हा मुद्दा मांडत राहू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, NTAने UGC-NETच्या इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचे जाहीर केले असून त्यासाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT