Tirupati Laddu Controversy: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरातील लाडू प्रसादाचा वाद वाढला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा करत सांगितलं की, लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात बाथरूम साफ करण्याचं केमिकल मिसळण्यात आलं होतं.
कुर्नूल येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले, “ही भेसळ केवळ तिरुपतीपुरती मर्यादित नसून श्रीशैलम मंदिरातही असाच प्रकार घडल्याची शक्यता आहे.”
नायडूंनी हे वक्तव्य अशा वेळी केलं आहे, जेव्हा YSR काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचा ठपका ठेवला होता. याआधी नायडूंनी लाडूमधील तुपात बीफ टॅलो आणि डुकराची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. मात्र CBIच्या चार्जशीटनुसार तुपात प्राणिजन्य चरबी आढळली नाही. मात्र वनस्पती तेल आणि काही रसायनांचा वापर करून तुपात भेसळ करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे.
ही भेसळ 2019 ते 2024 या काळात झाल्याचा आरोप असून, त्या काळात राज्यात वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होतं.
नायडूंच्या तेलुगु देसम पार्टीने (TDP), निवेदनात म्हटलं आहे की CBI च्या चार्जशीटनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप आहे. “लाडूमध्ये टॉयलेट साफ करण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल मिसळल्याचा प्रकार समोर येणं अत्यंत धक्कादायक आहे,” असं पक्षाने म्हटलं.
TDP च्या माहितीनुसार, मार्च 2022 ते मे 2024 या कालावधीत आरोपींनी वेगवेगळ्या नावांनी बनावट बिलं तयार केली. या काळात सुमारे 8,900 किलो LABSA / अॅसिड स्लरी आणि लॅक्टिक अॅसिड पुरवण्यात आलं, असा आरोप आहे. LABSA हे रासायनिक द्रव्य असून ते गिळल्यास गंभीर इजा किंवा मृत्यूही होऊ शकतो, असा दावा TDP ने केला आहे.
दरम्यान, YSR काँग्रेसने हे सर्व आरोप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितलं की, CBI च्या अहवालात प्राणिजन्य चरबीचा उल्लेख नाही आणि YSRCP शी संबंधित कोणाचंही नाव चार्जशीटमध्ये नाही.
“हा विषय सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत नेण्याचा आम्ही विचार करत आहोत. सरकारकडून खोटा प्रचार केला जात आहे,” असं रेड्डी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “CBI चा न्यायालयाच्या देखरेखीखाली तयार झालेला अहवालच अंतिम सत्य ठरेल. नायडूंनी नेमलेली एक सदस्यीय समिती ही फक्त दिखावा आहे.”
यावेळी रेड्डींनी नायडू, त्यांचे पुत्र लोकेश आणि पवन कल्याण यांच्यावरही टीका करत “देवाला राजकारणात ओढलं जात आहे,” असा आरोप केला. एकीकडे पवित्र प्रसादातील भेसळीचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे राजकीय आरोप–प्रत्यारोप… त्यामुळे तिरुपती लाडू प्रकरण आता केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय प्रकरण बनलं आहे.