Supreme Court PIL
नवी दिल्ली : "तुम्ही या सर्व याचिका मध्यरात्री तयार करता का?, असा संतप्त सवाल fरत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका वकिलाने दाखल केलेल्या पाच जनहित याचिका (PIL) फेटाळून लावल्या. तसेच सर्वच याचिका "असंबद्ध आणि निराधार असल्याचेही न्यायालयाने फटकारले. वकील सचिन गुप्ता यांनी दाखल केलेल्या पाचपैकी एका याचिकेत कांदा आणि लसूणमध्ये "तामसिक", म्हणजेच नकारात्मक, ऊर्जा आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, कांदा आणि लसणाशी संबंधित याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की, जैन धर्मात हे पदार्थ 'तामसिक' मानले जातात आणि ते खाल्ले जात नाहीत. यावर सरन्यायाधीशांनी आक्षेप घेत विचारणा केली की, "तुम्हाला जैन समाजाच्या भावना का दुखावायच्या आहेत?". न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने या याचिका स्पष्ट आधार नसलेल्या आणि विसंगत असल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने फटकारल्यानंतरही वकिलाने अजब युक्तिवाद केला. "ही एक सामान्य समस्या आहे; गुजरातमध्ये जेवणात कांदा वापरल्यामुळे एका व्यक्तीने घटस्फोटही घेतला आहे," यावर संताप व्यक्त करत सरन्यायाधीशांनी इशारा दिला की, "पुढच्या वेळी जर तुम्ही अशा निरर्थक याचिका घेऊन आलात, तर आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला समजेल."
सचिन गुप्ता यांनी दाखल केलेल्या इतर जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या होत्या....
दारू आणि तंबाखू उत्पादनांमधील हानिकारक घटकांवर नियंत्रण आणणे.
मालमत्तेची नोंदणी अनिवार्य करणे.
शास्त्रीय भाषा घोषित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवणे.
"जर तुम्ही वकील नसता, तर आम्ही तुमच्यावर मोठा दंड ठोठावला असता," अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या याचिकांना कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे सांगत न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावल्या.