प्रातिनिधिक छायाचित्र. file photo
राष्ट्रीय

Hindu Marriage Act |स्टॅम्प पेपरवरील 'करार विवाह' हिंदू कायद्यानुसार अवैध : हायकोर्ट

Hindu Marriage Act | हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी धार्मिक विधी आणि परंपरांनुसार सप्तपदी संपन्न होणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

Hindu Marriage Act

कोलकाता: केवळ स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करून केलेला 'विवाह' हा हिंदू कायद्यानुसार वैध मानला जाऊ शकत नाही. अशा विवाहाच्या आधारावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ (द्विपत्नीत्व) किंवा ४९८-अ (विवाहित महिलेचा छळ) अन्वये गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकत्ता उच्च न्यायालयाने दिला आहे.

खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

एका महिलेने (तक्रारदार) दावा केला होता की, २७ जून २०११ रोजी त्यांचा विवाह झाला होता. पत्नीने द्विपत्नीत्व आणि छळाचे आरोप करत फौजदारी खटला दाखल केला होता. महिलेने दावा केला होता की, दोघांनी स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करून विवाह केला होता. त्यानंतर ते एकत्र राहत होते. मात्र, पतीने नंतर दुसरा विवाह केला. अर्जदाराने त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हिंदू विवाह धार्मिक विधीत होणे आवश्‍यक

न्यायमूर्ती उदय कुमार यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केले की, हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ५ आणि ७ नुसार, हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी तो विहित धार्मिक विधी आणि परंपरांनुसार (उदा. सप्तपदी) संपन्न होणे आवश्यक आहे. स्टॅम्प पेपरवर केलेला करार हा केवळ एक कागदोपत्री व्यवहार आहे. द्विपत्नीत्वाच्या खटल्यात पहिला विवाह कायदेशीर अर्थाने 'संपन्न' झालेला असणे अनिवार्य आहे. तक्रारदाराने स्वतः हा विवाह 'स्टॅम्प पेपर'वर आधारित असल्याचे मान्य केल्यामुळे, द्विपत्नीत्वाचा आरोप लावणे कायदेशीररित्या अशक्य आहे.

... तोपर्यंत 'द्विपत्नीत्व' हा गुन्हा लागू होत नाही.

जोपर्यंत पहिला विवाह कायदेशीररित्या सिद्ध होत नाही, तोपर्यंत 'द्विपत्नीत्व' (Bigamy) हा गुन्हा लागू होत नाही. तसेच, जिथे विवाहाचे कायदेशीर अस्तित्वच नाही, तिथे 'पती' हे नाते सिद्ध होत नसल्याने कलम ४९८-अ अंतर्गत छळाचा गुन्हाही टिकू शकत नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

संशयिताविरोधात सर्व फौजदारी खटले केले रद्द

"करार विवाहाचा वापर फौजदारी कारवाईसाठी पाया म्हणून करता येणार नाही," असे स्पष्ट करत न्यायालयाने संबंधित व्यक्तीविरुद्धचे सर्व फौजदारी खटले रद्द केले (Quashed). मात्र, तक्रारदार महिला 'घरगुती हिंसाचार कायदा, २००५' अंतर्गत किंवा नागरी न्यायालयांत अन्य पर्यायी कायदेशीर मदत मागू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT