Sonam Wangchuk Safdarjung hospital : NEET परीक्षा पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि आंदोलक सोनम वांगचुक यांना आज पहाटे प्रशासनाने उपोषणस्थळावरून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या पार्श्वभूमीवर, "माझ्या, आमच्या कुटुंबाच्या आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय सोनम वांगचुक यांना तोंडावाटे किंवा शिरेवाटे कोणतेही औषध वा उपचार दिले जाऊ नयेत," अशी मागणी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
गीतांजली जे. अंगमो यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे. येथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आले आहे. माझ्या, त्यांच्या कुटुंबाच्या आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा शिरेवाटे (intravenous) कोणतेही औषध किंवा उपचार दिले जाऊ नयेत."
"सोनम वांगचुक यांची शुक्रवारी (दि. १८) प्रकृती ठीक होती. त्यांना रुग्णालयात आणण्याची काहीच गरज नव्हती. कलम ३२ अन्वये हा माझा अधिकार आहे," असेही त्यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले. दरम्यान, गेल्या २० दिवसांत ९ किलो वजन घटलेले असूनही वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला; सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळता उपोषण थांबवल्यास चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी म्हटले होते.
दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, २० दिवसांपासून उपोषणावर असलेल्या ५९ वर्षीय वांगचुक यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून "आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी" रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जंतरमंतर येथील आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ती जागा शांततापूर्ण मार्गाने रिकामी करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
"मी बाहेरून जरी अशक्त दिसत असलो तरी आतून खूप खंबीर आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण आतून आणि बाहेरूनही खंबीर आहात. आपल्याला या ऊर्जेची २० जुलै रोजी गरज भासेल, आपण संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढू. आपण एकत्र जाऊ आणि लोकशाहीच्या मंदिरात आपली बाजू मांडू," असे शुक्रवारी समर्थकांना संबोधित करताना वांगचुक यांनी म्हटले होते. "मी कोणत्याही परिस्थितीत २० जुलैपर्यंत जिवंत राहीन. जर तुम्ही आला नाहीत आणि २० जुलैची मोहीम यशस्वी झाली नाही, तर मी भूत बनून परत येईन," असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला होता.